प्रतिनिधी/ पणजी
शिवसेना यापुढे राज्यातील सर्व निवडणुका लढवणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपशी मैत्री असल्याने शिवसेनेने यापूर्वी गोव्यात लक्ष घातले नव्हते. परंतु भाजपने सेनेच्या पाठित खंजीर खुपसला. त्यामुळे यापुढे गोव्यातील सर्व निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
यंदा गोव्यातील निवडणुकीसाठी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे. सेनेने प्रत्यक्षात बारा उमेदवार रिंगणात उतरविले होते, परंतु पणजीचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा व्यक्त करून स्वतः माघार घेतली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
गोव्याला शिवसेनेची गरज
अलीकडे शिवसेना महाराष्ट्राबाहेर अन्य कित्येक राज्यातून निवडणूक लढवत असून गोव्यात पक्षाच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोव्याला शिवसेनेची गरज आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ शिवसेनेच्या नव्हे तर स्थानिकांच्या भवितव्याची आहे, असे ते म्हणाले.
संपूर्ण राजकीय प्रचार हा फुटीरता, द्वेष आणि असंबद्ध मुद्यांवर असतो, त्यामुळे खऱया मुद्यांना आवश्यक ती जागा मिळत नाही. म्हणुनच केंद्रात आणि राज्यात सुद्धा भाजप सरकार असूनही गोव्यात शाश्वत विकास झालेला नाही. नागरिकांसाठी पाणी, वीज यासारख्या मुलभूत गरजाही पुरवण्यात या सरकारला अपयश आले असून आजही नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. यावरून नागरिकांची प्रगती झाली, राज्याची प्रगती झाली, की नेत्यांची? हे आता मतदारांनीच ठरवावे व त्यानुसार मतदान करावे, असे ठाकरे पुढे म्हणाले.