कुडाळ न. पं. निवडणूक : आमदार दीपक केसरकर यांची माहिती : काँग्रेस सहभागी झाल्यास सेनेच्या काही जागा सोडणार : आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येणार!
वार्ताहर / कुडाळ:
कुडाळ न. पं. निवडणुकीसाठी शिवसेनेला तेरा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा असा फॉर्म्युला सध्या निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रीय काँग्रेस
प्रदेशाध्यक्षांशी आपण चर्चा केली असून काँग्रेस आमच्यामध्ये सहभागी झाल्यास शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या जागांपैकी काही जागा त्यांना सोडण्यात येतील. कुठल्याही परिस्थितीत आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
आमदार वैभव नाईक यांनी शहराच्या विकासकामांसाठी आणलेला निधी न. पं. च्या विद्यमान सत्ताधाऱयांनी खर्च केला नाही, असा आरोपही त्यांनी केला. कुडाळ न. पं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही प्रभागात केसरकर यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या निवासस्थानानजीक आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक काका कुडाळकर, संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, विकास कुडाळकर, संतोष शिरसाट, अमरसेन सावंत, संजय भोगटे, अतुल बंगे, बबन बोभाटे, सुनील भोगटे, संदीप म्हाडेश्वर, चेतन पडते तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशने निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढविल्या जाव्यात, अशी सर्वांची अपेक्षा आहे. आपण मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन चर्चा केली. ज्या-ज्यावेळी या जिल्हय़ात निवडणुका होतात, त्याकडे विशेष बाब म्हणून पाहिले जाते आणि या जिल्हय़ात जो लढा चालतो, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आमच्यामध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती आपण त्यांना केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांशी ते यासंदर्भात बोलणार आहेत. त्या पक्षाचा सकारात्मक निर्णय झाला, तर शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या जागांपैकी काही जागा काँग्रेसला सोडल्या जातील.
आघाडीला शंभर टक्के यश मिळणार
सध्या शिवसेना-तेरा व राष्ट्रवादी-चार असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. यातील कुठली जागा कमी-जास्त करायची झाल्यास दोन्ही पक्ष तयार आहेत, असे त्यांनी सांगून जिल्हय़ातील कुडाळ ही महत्वाची उद्योगनगरी आहे. ती वैभवशाली असली पाहिजे, म्हणून आमदार नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणाऱया या निवडणुकीत आघाडीला शंभर टक्के यश मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विद्यमान सत्ताधाऱयांमुळे निधी अखर्चित
आमदार नाईक यांनी शिवसेनेच्या माध्यमातून कुडाळ शहरासाठी आणलेला निधी विद्यमान सत्ताधाऱयांनी खर्च करायला दिला नाही. जनतेचे पैसे हे जनतेसाठीच खर्च झाले पाहिजेत. सुसज्ज उद्यान असावे, यासाठी आमदार नाईक यांनी दिलेला पाच कोटीचा निधी त्यांनी खर्च केला नाही, असा आरोप त्यांनी केला.
वैभव नाईक यांच्याकडून कुडाळमध्ये विविध कामे
येत्या काही महिन्यांतच जिल्हय़ातील एक सुसज्ज उद्यान येथील भंगसाळ नदीच्या काठावर साकारुन कुडाळच्या वैभवात भर पडणार आहे. आमदार नाईक यांनी शहरात क्रीडांगण पूर्ण केले, तर मालवणी नटसम्राट मच्छींद कांबळी यांच्या नावाने नाटय़गृह उभारण्याचे काम सुरू आहे. शहराला भविष्यात पाणी टंचाई होऊ नये, यासाठी भंगसाळ नदीवर नवीन बंधारा बांधला. महिला रुग्णालयाचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले. अग्निशमन दलसाठी त्यांनी जिल्हा नियोजनमधून निधी आणला, अशी माहिती त्यांनी दिली.
शहराच्या विकासासाठी आघाडीची भूमिका-काका कुडाळकर
काका कुडाळकर म्हणाले, निवडणुका जाहीर झाल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस अशी आघाडी जिल्हय़ात व्हावी, यादृष्टीने प्रयत्न होते. आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठांच्या धोरणामुळे महाआघाडी शक्य झाली नाही. आज शिवसेना व राष्ट्रवादीने गुणवत्तेच्या आधारे विचार केला आहे. काँग्रेसचा निर्णय होऊन महाविकास आघाडी होण्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष ऍडजेस्ट करणार आहोत. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक कुडाळ शहर विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. कुडाळ न. पं. पाच वर्षे दुर्दैवाने विरोधी सत्तेकडे होती. पुन्हा जर भाजपकडे सत्ता गेली, तर विकास खोळंबणार आहे आणि म्हणूनच शहराच्या विकासासाठी सहकार्याची भावना म्हणून राष्ट्रवादीने आघाडीची भूमिका घेतली आहे.