ओरोस येथे 8 रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : उस्मानाबाद, बीड, अहमदनगर येथे जाणार यात्रा
प्रतिनिधी / देवगड:
देवगड तालुका शिवसेनेच्यावतीने राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱयांना प्रबोधन करण्यासाठी 8 ते 16 फेब्रुवारी या दरम्यान ‘बळीराजा आत्मविश्वास यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा शुभारंभ 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. ओरोस येथून करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम व माजी तालुकाप्रमुख ऍड. प्रसाद करंदीकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
देवगड शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी जि. प. माजी सदस्य विष्णू घाडी उपस्थित होते. यावेळी ऍड. करंदीकर म्हणाले, राज्यात शिवसेना महाआघाडीचे सरकार आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडी शासनाच्यावतीने शेतकऱयांच्या हिताचे निर्णय घेतले. हे निर्णय शेतकऱयांपर्यंत पोहोचवून बळीराजाचा आत्मविश्वास दृढ करण्याच्या दृष्टीने तसेच शेतकऱयांना आत्महत्येपासून परावृत्त करणे हा हेतू या बळीराजा आत्मविश्वास यात्रेचा आहे. कर्जदार शेतकऱयांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आधार देणे तसेच शेतकऱयांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या यात्रेतून होणार आहे. ही यात्रा ओरोस येथून सुरू होऊन उस्मानाबाद, बीड व अहमदनगर येथे जाणार आहे. या यात्रेचा समारोप अहमदनगर येथे 16 फेब्रुवारी रोजी होणार असून 17 फेब्रुवारी रोजी आंगणेवाडी यात्रेच्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या यात्रेचा अहवाल देण्यात येणार आहे.
या यात्रेचा शुभारंभ 8 फेब्रुवारीला ओरोस येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून यावेळी खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर तसेच जिल्हय़ातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यात्रेमध्ये सुमारे 20 कार्यकर्त्यांचे पथक असणार आहे. या यात्रेचे नेतृत्व देवगड तालुकाप्रमुख साटम व ऍड. करंदीकर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.