ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena) नेत्यांची खदखद पुन्हा समोर आली आहे. काही दिवसापूर्वी शिवसेनेचे २५ आमदार (MLA) नाराज असल्याच्या बातम्या होत्या. पण यावर शिवसेनानेत्यांनी कोणीही नाराज नसल्याचे म्हटले होते. आता यांनतर शिवसेना खासदारही नाराज असल्यालच बोललं जात आहे आणि हे खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा एका भाजप नेत्याने केला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना खासदार नाराज आहेत. शिवसेनेच्या एकूण १८ पैकी १४ खासदार भाजपच्या (BJP) संपर्कात आहेत आणि ते योग्यवेळी भाजपात येतील, असा दावा भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला आहे. तर आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी ४० खासदार भाजपचे असतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
प्रसाद लाड काय म्हणाले?
आमदार लाड यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लबोल केला आहे. त्यांनी ”शिवसेनेने हिंदूत्व सोडलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार नाराज आहेत. १८ पैकी जवळपास सर्वच खासदार पालकमंत्र्यांवर नाराज आहेत. खासदारांना माहिती आहे की, ते मोदींशिवाय निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या १८ पैकी १४ खासदार लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करतील, असा विश्वास आहे. सर्व खासदार हिंदूत्वाची भूमिका घेऊन शिवसेनेत आहेत. पण, सेनेने हिंदूत्व सोडलं आहे. त्यांच्या मतदारसंघात जनतेला उत्तर देताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे हिंदूत्वाची भूमिका घेणाऱ्या पक्षासोबत हे खासदार येतील”, असं प्रसाद लाड म्हणाले.
दिल्लीत बैठक
दरम्यान, खासदार संजय राऊत (sanjay raut) आणि विनायक राऊत (vinayk raut) यांच्या नेतृत्वात शिवसेना खासदारांची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. यावेळी खासदारांनी त्यांची नाराजी बोलून दाखवल्याचं कळतंय. तसेच आपल्या मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचला. तसेच सेना खासदारांनी राष्ट्रवादी (NCP) नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील मंत्री शिवसेनेच्या नेत्यांची कामे करत नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. यावर खासदार संजय राऊत यांनी जिल्ह्यात पालकमंत्री कोणाचाही असो कामं तिन्ही पक्षाची झाली पाहिजे असा इशारा यावेळी दिला.