ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या काही दिवसांपासून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होताना दिसतेय. पण आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या जवळपास 25 आमदारांनी निधीवाटपात होत असलेल्या अन्यायाबाबत आवाज उठवण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचीही माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालीय. आम्हाला जर निधी मिळाला नाही, तर अर्थसंकल्प मांडत असताना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या गोटात एकच खळबळ उडालीय. 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 11 मार्चला सादर करण्यात येणार असून, त्यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहणं आवश्यक असतं.
यापूर्वी शिवसेनेकडूनच अर्थखात्याचा कारभार सांभाळणाऱ्या अजित पवार यांच्या कारभारावर बोट ठेवण्यात आले होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही निधीवाटपात कायम राष्ट्रवादीला झुकते माप मिळते, अशी कुजबुज महाविकासआघाडीच्या अंतर्गत वर्तुळात असते. मात्र, यावेळी शिवसेनेच्या काही आमदारांनी याबाबत जाहीरपणे पक्षश्रेष्ठीकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई या दोन ज्येष्ठ नेत्यांवर आमदारांची समजूत काढण्याची जबाबादरी सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नाराज आमदार आता एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्यासमोर काय व्यथा मांडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.