मंदार केणी यांची दत्ता सामंत यांच्यावरील टीका हास्यास्पद
मालवण पं. स. गटनेते सुनील घाडीगावकर यांचा पलटवार
प्रतिनिधी / मालवण:
विधानसभा निवडणुकीत रडीचा डाव खेळून शिवसेनेने दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. अन्यथा त्याचवेळी आमदार वैभव नाईक यांचा पराभव निश्चित होता. आजही आमदार नाईक यांच्यात हिम्मत असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन सामंत यांच्या विरोधात जिंकून दाखवावे. त्यानंतरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हेकुई करावी. शिवसैनिकांना डावलून स्वत: पदे घेऊन स्वार्थ साधणाऱया मंदार केणी यांनी सामंत यांच्यावर टीका करणे हे हास्यास्पदच म्हणावे लागेल, असा पलटवार पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर यांनी शिवसेनेवर केला आहे. बांधकाम सभापती केणी यांनी भाजप नेते सामंत यांच्यावर केलेल्या टीकेला घाडीगावकर यांनी प्रत्युत्तर देताना केणी यांच्या कारभारावर टीका केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात घाडीगावकर म्हणाले, आमचे नेते नारायण राणे यांनी केणी यांना तालुकाध्यक्ष पद दिले होते. त्यावेळी त्यांनी काय दिवे लावले व आता शिवसेनेत प्रवेश करून स्वत:चा स्वार्थ साधत आहेत, निष्ठावान शिवसैनिकांना बाजूला सारत आपल्या पदरात पदे घेऊन केवळ आमदार, खासदारांना खुश ठेवण्याचे काम केणी दिवसभर करतात. ते शिवसेनेत प्रवेश करताना निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांना आधी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागायला लावली होती, यावरूनच केणी यांची किंमत दिसून येते. दत्ता सामंत हे गेली अनेक वर्षे समाजकारण करून राजकारण करत आहेत. राणेंचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करून गोरगरीब जनतेला मदत कार्य करणे यात त्यांचे सातत्य आहे. आता कोरोना काळातही ऑक्सिजन पुरवठय़ासह अन्य औषधोपचार व मदतकार्य ते सातत्याने करत आहेत. त्यामुळेच जनतेतून सामंत यांची वाढत जाणारी लोकप्रियता पाहता, पायाखालील वाळू सरकल्याने आमदार व त्यांचे कार्यकर्ते सैरभैर होऊन टीका करण्याचे काम करत आहेत. मात्र, जनतेला सत्य माहीत असून कोण काम करतो आणि कोण राजकारण करतो हे जनता ओळखून आहे. तेव्हा यापुढे सामंत यांच्याबद्दल टीकाटिपणी केल्यास जसेच्या तसे उत्तर दिले जाईल.
शिवसेनेच्या चिल्लर गँगची कोल्हेकुई!
सामंत हे शिवसेनेत यावेत, यासाठी शिवसेनेची नेते मंडळी सामंत यांच्याशी संपर्क करून विनवण्या करत होती. मात्र, राणेंशी निष्ठावान असल्याने शिवसेनेच्या नेते मंडळींना सामंत भीक घालत नसल्याने केवळ बदनामी करण्याच्या हेतूने शिवसेनेच्या चिल्लर गँगची कोल्हेकुई सुरू आहे, असा टोला घाडीगावकर यांनी लगावला आहे.