प्रतिनिधी/ सातारा
विसावा नाका परिसरात असलेल्या जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी बाहेर पडून वनवासवाडीतील नागरिकांना व व्यवसायिकांना गेल्या सात ते आठ वर्षापासून सातत्याने त्रास होत होता. त्याबाबत शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रमेश बोराटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देवून प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. प्राधिकरणाच्या अभियंता पल्लवी मोटे यांनी यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न सोडवला आहे. त्याबाबत शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आभार मानले गेले.
शिवसेनेचे रमेश बोराटे यांनी वनवासवाडीतील नागरिकांना भेडसावणाऱया समस्येषियी दि.10 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा दिला होता. व कार्यवाही करण्याची विनंती पत्राद्वारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केली होती. प्राधिकरणाच्या अभियंता पल्लवी मोठे यांनी याकडे लक्ष घालून दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार त्यांनी दुरुस्ती केली. व तसे पत्र रमेश बोराटे यांना देण्यात आले. त्या पत्रात म्हटले आहे, विसावा जलशुद्धीकरण केंद्राच्या संरक्षक भिंतीमधून ज्या ठिकाणाहून पाणी बाहेर पडत आहे त्या ठिकाणची पाहणी करण्यात आली असून जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर वॉश करताना वॉश आऊट पाईपवरील चेंबर फुटून पाणी बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी वॉश आऊट पाईप चेंबरची दुरुस्ती करुन पाणी बाहेर न पडण्याबाबत दक्षता घेवून आवश्यक ती कामे करण्यात येत आहेत. दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी काम करण्यात आल्याचे दाखवण्यात आल्याचे म्हटले आहे.