मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. भुजबळांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. पण त्यांना झालेला हा त्रास कधीही भरुन निघणार नाही. शेवटी न्यायदेवतेने हा न्याय दिलेला आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागेल. भुजबळ यांनी जे काम केले होते, ते योग्य पद्धतीने होते, यावर आज या निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे. कोर्टाच्या निकालानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी छगन भुजबळांचं तोंडभरुन कौतुक करत त्यांनी योग्य प्रकारेच काम केलं होतं, त्यांनी कोणतंच अयोग्य काम केलं नव्हतं, असं म्हटलं.
छगन भुजबळ यांनी जे काम केलं होतं, ते योग्य पद्धतीनेच केलं होतं, यावर आज कोर्टाच्या निकालाने शिक्कामोर्तब झालं आहे. शेवटी न्यायदेवतेने हा न्याय दिलेला आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागेल, असं गुलाबराव पाटील म्हणाले.