नेताजी जाधव यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमावासियांच्या मानगुटीवर बसविलेले महाजन अहवालाचे भूत शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनामुळेच गाडले गेले. अन्यथा, सीमावासियांवर मोठा अन्याय झाला असता. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी मराठी भाषिकांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न केले. त्यांचे पुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचा वारसा चालवित आहेत. सीमाप्रश्न ते चांगल्या पद्धतीने हाताळत असून लवकरच हा प्रश्न सोडवतील, असा विश्वास माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी व्यक्त केला.
बसवेश्वर सर्कल खासबाग येथील व्यापारी बंधु मंडळ व वायुपुत्र युवक मंडळातर्फे शनिवारी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी नेताजी जाधव बोलत होते. प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, सागर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णा हलगेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बाबू जाधव, सुभाष शिनोळकर, वासू सामजी, अनिल शिंदे, बंडू बामणे, राजू मेलगे, परशराम पाटील, विजय हलगेकर, सुनील गोरले, सतीश शिंदे, रोहित भाकोजी, मितेश शिगेहळ्ळीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.