ऑनलाईन टीम / रायगड :
माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांनी रायगडमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतीत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकासआघाडी स्थापन केली असली तरी देखील स्थानिक पातळीवरील पक्षातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी आघाडीचा विचार करु नये, आपले घर सांभाळावे, असे गिते यांनी म्हटले आहे.
श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात गीते बोलत होते. ते म्हणाले, काँगेस राष्ट्रवादीचे विचार एक आहेत का? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कधीच होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. त्यामुळे शरद पवार हे आमचे नेते कधीच होऊ शकत नाहीत, असे बाळासाहेब ठाकरेच सांगायचे.
दरम्यान, आघाडी ही फक्त सत्तेची तडजोड आहे. ती तुटू नये, पण तुटेल त्या दिवशी काय? त्या दिवशी तुम्ही तटकरेंच्या घरी जाणार का? आपल्याच घरी येणार ना? मग त्यासाठी आपलं घर टिकवायचं की नाही? म्हणून आपली ताकद वाढवायची आहे, असेही गीते म्हणाले.