खानापूर / प्रतिनिधी
शिवाजीनगर-खानापूर येथील रहिवासी एस. जी. शिंदे गेली 23 वर्षे श्री नरसिंह जयंती उत्सव आपल्या निवासस्थानी स्वखर्चाने आयोजित करतात. कोरोना महामारीमुळे दि. 6 मे 2020 रोजीचा हा उत्सव होऊ शकला नाही. श्री गणेश मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा योग साधून त्यांनी हा उत्सव मंडळाच्या समुदायभवनमध्ये स्वखर्चाने आयोजित केला होता. घरगुती असूनही हा उत्सव समुदाय भवनच्या सभागृहात स्वखर्चाने आयोजित केला आहे. अशा आशयाचा फलक समागृहाच्या बाहेर लावला होता. त्याबद्दल शिंदे यांनी श्री गणेश उत्सव मंडळाचे जाहीर आभार मानले.
या निमित्त लोकसंस्कृती नाटय़कला संस्था खानापूर या संस्थेच्या खानापूर तालुक्यातील निवडक व उत्कृष्ट गायकांचा संगीत भजन कार्यक्रम आयोजित केला होता. सुराप्पा पाटील मणतुर्गा, धर्माजी नंद्रणकर व कृष्णा गुरव शिरोली, नारायण कांबळे कणकुंबी, महेश कुंभार गर्लगुंजी, मष्णू चेर्लेकर मयेकरनगर, रघुनाथ उत्तूरकर शिवाजीनगर, गायत्री कुंभार गर्लगुंजी व दीपक चोर्लेकर दारोळी यांनी उत्कृष्ट भजन सादर केले. श्रद्धा कुंभार गर्लगुंजी हिने अफजल खान वध या विषयावर पोवाडा सादर करुन, श्रोत्यांची मने जिंकली. शिवाजीनगर येथील दिव्यानी शेलार व आशितोष शेलार यांनी उत्कृष्ट भजन सादर केले. संस्थेचे संचालक नामदेव पाटील इदलहोंड, नारायण गावडे आमगाव, संभाजी पाटील असोगा, गोपाळ थोराप्पा घाडी होनकल, गोविंद चिखलकर वरकड पाटय़े आदी उपस्थित होते. लक्ष्मी शिंदे यांनी पसायदान म्हटले, महाप्रसादानंतर उत्सवाची सांगता झाली.