शेकडो लीटर पाणी वाया, हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी, शिवाजी कॉलनी येथे शेकडो लीटर पाणी वाया गेले आहे. हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनी दुरुस्ती करताना ही पाईप फुटली असून परिसरात पाणीच पाणी झाले आहे. याची माहिती महानगरपालिका व पाणीपुरवठा विभागाला दिल्यानंतर तब्बल दीड तासांनी नळ कनेक्शन बंद करून गळती रोखण्यात आली आहे. मात्र, त्यावर ठोस तोडगा काढण्यात आलेला नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल वारंवार संशय व्यक्त करण्यात येत असतो. मात्र, यावेळी हेस्कॉमने पाण्याची पाईप फोडल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. हेस्कॉमचे काही कर्मचारी दुरुस्तीसाठी शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथे गेले होते. मात्र त्या ठिकाणी खोदाई करताना पाणीपुरवठा करण्याची पाईप फोडण्यात आली. त्यामुळे शेकडो लीटर पाणी वाया गेले आहे. टिळकवाडी परिसरातील नागरिकांनी याची माहिती महानगरपालिकेला दिली. त्यानंतर काही कर्मचाऱयांनी ती गळती थांबविली आहे. मात्र शहर आणि परिसरात वारंवार अशा गळत्या लागतच असतात. सध्या तरी स्मार्ट सिटीच्या योजनेंतर्गत विविध कामांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गळती लागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तेव्हा यापुढे तरी असे प्रकार थांबवावेत, अशी मागणी होत आहे. टिळकवाडी येथील गळती तात्पुरती दुरुस्त करण्यात आली असली तरी त्यावर ठोस उपाययोजना करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.