शिवाजी विद्यापीठाचा 59 वर्धापन विविध कार्यक्रमांनी संपन्न
कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाने नॅक'चे
A++’ मानांकनासह देशविदेशांतील शैक्षणिक व संशोधकीय स्वरुपाचे अनेक शिखरे सर केली आहेत. विद्यापीठाची ही घोडदौड गौरवास्पद आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून राबविलेले उपक्रम सुद्धा अनुकरणीय आहेत. शंभर वर्षांहून अधिक काळाचा वारसा असलेल्या विद्यापीठांच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठाने अवघ्या 59 वर्षांत साधलेली प्रगती नेत्रदीपक आहे, असे गौरवोद्गार सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी काढले. शिवाजी विद्यापीठाच्या 59 व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, उच्चशिक्षण क्षेत्रात कार्यरत लोकांनी, विशेषतः शिक्षकांनी उच्चशैक्षणिक वारसा वृद्धिंगत करण्याची जबाबदारी स्विकारायला हवी. विद्यार्थ्यांचा कल समजून घेऊन योग्य मार्गदर्शन पालकांसह शिक्षकांनी करावे. उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी मनःशांतीही तितकीच महत्त्वाची आहे. हे कोरोनाने दाखवून दिले आहे. आरोग्याच्या संदर्भात केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक सुदृढतेलाही बरोबरीचे स्थान आहे. तसेच शिक्षणाच्या संदर्भात दर्जावृद्धी महत्त्वाची मानली आहे. निसर्ग व पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही शिक्षण क्षेत्राने घ्यायला हवी.
अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, माहिती तंत्रज्ञान व तत्संबंधी संशोधन विकासावर `इंडस्ट्री-4.0′ खूप वेगाने विस्तारत आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यास सुसज्ज करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने शिवाज विद्यापीठात विविध सेवांचे ऑटोमेशन करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. काही सेवा कार्यान्वितही झाल्या आहेत, असे डॉ. शिर्के यांनी सांगितले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी. आर. पळसे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, डॉ. एस. एस. महाजन, आयक्यूएसी संचालक डॉ. एम. एस. देशमुख, डॉ. नमिता खोत, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड आदी उपस्थित होते.
विद्यापीठातील गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. एस.एस. महाजन यांना देण्यात आला. बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील डॉ. अनिलकुमार कृष्णराव वावरे यांना, तर कै. प्राचार्य श्रीमती सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार कासेगाव (जि. सांगली) येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या डॉ. तेजस्विनी दीपक पाटील-डांगे यांना प्रदान करण्यात आला.विद्यापीठातील गुणवंत सेवक म्हणून स्वाती खराडे, फिरोज नायकवडी, अजय आयरेकर, बबन चौगले यांना गौरवण्यात आले. महाविद्यालयांतील गुणवंत प्राचार्य: कराड येथील एस. जी. एम. कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, विवेकानंद कॉलेजचे डॉ. रमेश कुंभार. तसेच विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांचाही सन्मान करण्यात आला.