प्रतिनिधी / कोल्हापूर
विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचाऱयांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिवाजी विद्यापीठ कृती समितीने गुरुवार (24 सप्टेंबर) पासून लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. याबाबत गुरुवार (1 ऑक्टोंबर) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने लेखणी बंद आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात येत असल्याची माहिती सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी दिली.
सरकारला विविध मागण्यांसाठी 17 ऑक्टोंबर पर्यंतची मुदत दिली असून या दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास 19 ऑक्टोंबर पासून पुन्हा आंदोलन सुरु करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
राज्य शासनाच्या अखत्यारितील कृषी विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू केला नाही. नव्याने रुजू झालेले महाविद्यालयीन कर्मचारी वगळता इतरांना अद्याप सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चीती करण्यात आली नाही. विद्यापीठ कर्मचाऱयांना आश्वासित प्रगती योजना लागू करणे या विविध मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कृती समितीच्या वतीने गुरुवार (24 सप्टेंबर) पासून लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. गुरुवार (1 ऑक्टोंबर) रोजी मुंबई मंत्रालयामध्ये कृती समितीच्या पदाधिकाऱयांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक पार पडली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कर्मचाऱयांच्या न्याय मागण्या येत्या 15 दिवसात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच आंदोलन मागे घेण्याचीही विनंती केली. यामुळे कृती समितीने हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. राज्यशासनाला 15 दिवसांची म्हणजेच 17 ऑक्टोंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास 19 ऑक्टोंबर पासून पुन्हा तीव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचाऱयांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत कृती समितीची बैठक पार पडली. यामध्ये मंत्री सामंत यांनी मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. यामुळे आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात येत असल्याची माहिती सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी दिली.