प्रतिनिधी/ वाई
महामार्गावर पडलेले खड्डे आणि टोल नाक्याकडून होत असलेली गैरसोय याबाबत आमदार शिवेंद्रराजे यांनी दि. 18 डिसेंबर 2019 ला आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले होते. त्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाई न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्यासमोर खटल्याची अंतिम सुनावणी होऊन सबळ पुराव्या अभावी आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह 18 जणांची निर्दोष मुक्तता झाली.
वाई न्यायालयात आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांतर्फे ऍड.शिवराज धनवडे, ऍड. आर. डी. साळुंखे, ऍड. संग्राम मुंढेकर, ऍड. प्रसाद जोशी तर सरकार पक्षातर्फे ऍड. मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले.
महामार्गावर पडलेले खड्डे, टोल नाक्यावर होत असलेली गैरव्यवस्था यावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे हे आक्रमक होऊन आंदोलन केले होते. त्यावेळी जिह्यात जमावबंदी आदेश लागू होता. भुईंज पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल धनाजी कदम यांनी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याची फिर्याद दाखल केली होती.
त्याचे दोषापत्र दाखल झाल्यानंतर वाई न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, जितेंद्र सावंत, फिरोज पठाण, मिलिंद कदम, सर्जेराव सावंत, जयश्री गिरी, सरिता इंदलकर, विद्या देवरे, कांचन साळुंखे, जितेंद्र कदम, सुहास गिरी, धनंजय जांभळे, नासिर शेख, अशोक मोने, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, अमोल मोहिते हजर झाले. दुपारी न्यायाधीश गिरवलकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत सबळ पुरावेच नसल्याने सगळ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.