शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती, आठवीतील विद्यार्थ्यांसाठी 1 हजार, पाचवासाठी 750 रूपये
प्रतिनिधी / कोल्हापूर
विद्यार्थी हित लक्षात घेवून शिष्यवृत्तीच्या रकमेत लवकरच वाढ करणार आहे. यामध्ये आठवीमध्ये शिष्यवृत्तीrसाठी पात्र विद्यार्थ्यांना महिना 1 हजार आणि पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी 750 रूपये वाढ करणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
गायकवाड म्हणाल्या, दुसऱया टप्प्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरक्षित वातावरणात सुरू करणार आहे. शाळाबाहÎ विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणार असून समग्र शिक्षा खाजगी शाळांच्या अनुदानाबद्दल केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोरोनाच्या नियमांचे पालन करीत 9 ते 12 वीचे वर्ग सुरू केले आहेत. सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जाते. 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करताना पालक आणि स्थानिक प्रशासनाला विचारात घेतले जाईल. व्हिजन 2025 च्या माध्यमातून भविष्यात शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केला जाईल. आदर्श शाळेसाठी मूलभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रमांची निर्मिती केली जाईल.
जुनी पेन्शन योजना लागू करणर
शिक्षकांच्या मागणीचा विचार करून तांत्रिक अडचणी दूर करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मार्ग काढणार आहे. त्यासाठी मंत्रालयात बैठक घेवूनच निर्णय घेतला जाईल. चतुर्थश्रेणी कामगारांच्या ठोक मानधनावरील भरतीबाबत नव्याने काढलेला आदेशही रद्द केला जाईल, असे मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.
विनाअनुदानित शाळांना नियमानुसार अनुदान
ज्या विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळाले नाही, त्यांना 20 टक्के अनुदान आणि ज्या शाळांना 20 टक्के अनुदान आहे, त्यांना 40 टक्के अनुदान देण्यासाठी तपासणी सुरू आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर विनाअनुदानित शाळांना लवकरच प्रचलित नियमानुसार अनुदान देणार.
दहावी-बारावीची परीक्षा एप्रिलमध्ये
कोरोना कालावधीमुळे शाळा बंद असल्याने फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी बारावीची परीक्षा घेता येणार नाही. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस दहावी-बारावीची परीक्षा घेण्याचा विचार आहे.