बहुतांश शाळांमध्ये अलगीकरण केंद्र, पर्यवेक्षकांची आरटीपीसीआर, विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी आवाक्याबाहेर
कोल्हापूर / अहिल्या परकाळे
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांच्या पूर्वनियोजित तारखा बदलल्या गेल्या. आता या परीक्षा 25 जुलै रोजी घेण्यासंदर्भात परीक्षा परिषदेने अहवाल मागवले आहेत. मात्र कोरोना नियमांचे पालन करीत या परीक्षा घेणे अडचणीचे असल्याचे शिक्षण तज्ञांचे मत आहे. त्यामुळे या वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षा होणार की नाही यावर अनिश्चिततेचे ढग पसरले आहेत. गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थ्यांनी खासगी क्लासवर हजारो रुपये खर्च करून अभ्यासही केला आहे. पण परीक्षाच झाल्या नसल्याने पालक, विद्यार्थी संभ्रमात आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षा घ्यायच्या असतील तर पर्यवेक्षकांची आरटीपीसीआर, विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करणे जिकिरीचे काम आहे. शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु शासन आदेशानुसार आरटीपीसीआर होणे आवश्यक आहे. तसेच एखादा विद्यार्थी बाधित असला तर इतरांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील काही शाळांच्या इमारती या कोरोना प्रतिबंधक अलगीकरण केंद्रासाठी दिल्या आहेत. त्यामुळे या इमारती जिल्हा प्रशासनाच्या ताब्यातून घेणे, त्यांची स्वच्छता, सॅनिटायझेशन करणे हे शाळांसाठी अडचणीचे ठरत आहे. या परीक्षांसंदर्भात जिल्हा परिषदेने अद्याप कोणतेही नियोजन केले नसले तरी 25 जुलै रोजी होणाऱया शिष्यवृत्ती परीक्षा घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 23 मे रोजी होणार होती. यादृष्टीने केंद्रसंचालक, पर्यवेक्षक नियुक्ती, परीक्षा केंद्र निश्चिती करण्यात आली होती. मात्र दहावी-बारावीची परीक्षा रद्द केल्याने या परीक्षा कशा घ्यायच्या, असा पेच राज्य सरकारसमोर उभा राहिला होता. त्यामुळे तज्ञांशी चर्चा करून शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेण्याची घोषणा करण्यात आली. कारण या शिष्यवृत्ती परीक्षांमधूनच विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकाचे मूल्यमापन केले जाते. विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडीचा कल समजतो. भविष्यातील स्पर्धा परीक्षेचा पाया या परीक्षांच्या माध्यमातून पक्का होतो. त्यामुळे ही परीक्षा होणेही तितकेच गरजेचे आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थी, केंद्र, पर्यवेक्षक संख्या
पाचवी विद्यार्थी परीक्षा केंद पर्यवेक्षक
22,000 142 2000
आठवी विद्यार्थी परीक्षा केंद पर्यवेक्षक
11,000 96 1500
नियमांचे पालन करून परीक्षा घेणे उचित
परीक्षा परिषदेने 25 जुलै रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेता येईल का यासंदर्भातील अभिप्राय मागवले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कोरोनाच्या नियमांचे पालन करीत परीक्षा घेणे उचित होईल, असा अभिप्राय पाठवला आहे. राज्यभरातील अभिप्राय पाहून परीक्षा घ्यायची की नाही यासंदर्भात परीक्षा परिषद निर्णय घेईल. परीक्षा परिषदेने परीक्षा घेण्याचे आदेश दिल्यास जिल्हाधिकाऱयांच्या परवानगीने पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन केले जाईल. – आशा उबाळे (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर)