प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये निकालाच्या टक्केवारीनुसार पाचवीच्या परीक्षेत रत्नागिरी जिह्याला राज्यात तृतीय तर आठवीमध्ये 8 वा क्रमांक मिळाला आहे.
फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा झाल्या होत्या. कोरोनामुळे या परीक्षांचे निकाल लांबले. 9 ऑक्टोबरला या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. पाचवीच्या परीक्षेत राज्यात कोल्हापूरने पहिला तर सिंधुदुर्ग जिह्याने द्वितीय क्रमांक पटकावला. रत्नागिरी जिह्याला तिसरा क्रमांक मिळाला आहे. हा अंतरिम निकाल असून यामध्ये अंशत: बदल होण्याची शक्यता असली तरीही उर्त्तीर्णता व गुणवत्तेमध्ये फार मोठय़ा बदलांची शक्यता नाही.
रत्नागिरी जिह्यातील 9,461 विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदले गेले होते. त्यातील 9,374 विद्यार्थी परीक्षेला बसले. 4,034 विद्यार्थी शिष्यवृत्तीत पात्र ठरले आहेत. हे प्रमाण 43.03 टक्के आहे. आठवीच्या परीक्षेला 5,365 विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. त्यातील 5,301 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. शिष्यवृत्तीसाठी 1,252 विद्यार्थी पात्र ठरले असून हे प्रमाण 23.61 टक्के आहे. निकाल पाहण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली होती. त्याची माहिती वेळेत न पोहोचल्यामुळे पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. या परीक्षेत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. शिष्यवृत्तीमध्ये चांगले गुणांकन व्हावे, यासाठी शिक्षण विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत. पाचवी शिष्यवृत्तीत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी भरघोस कामगिरी केली आहे.