परीक्षा आता 12 ऑगस्ट रोजी
प्रतिनिधी / पुणे:
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखा आतापर्यंत पाचवेळा रद्द झाल्या. आता सहाव्यांदा निश्चित झालेली 9 ऑगस्ट ही तारीखही महापूर आणि भुस्खलनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळणात अडचणी येणार असल्याचे कारण देत परीक्षा परिषदेने रद्द केली आहे. आता ही परीक्षा 9 ऐवजी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे.
इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱया किंवा तिसऱया रविवारी घेतली जाते. परंतु, यंदा या काळात कोरोनाचा कहर सुरू होता. त्यामुळे फेब्रुवारीऐवजी 25 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली. मात्र, अपेक्षित परीक्षार्थी संख्या न झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 23 मे, 21 जून, 8 ऑगस्ट या तारखा निश्चित झाल्या. 8 ऑगस्टला सेंट्रल आर्म पोलीस फोर्स पदाची परीक्षा असल्याने आणि त्यासाठी नेमकी शिष्यवृत्ती परीक्षेचीच केंदे अधिग्रहित केली गेल्याने पुन्हा तारीख बदलून 9 ऑगस्ट करण्यात आली.
दरम्यान आता काही दिवसांपूर्वी उद्भवलेली पूरस्थिती व काही भागात झालेले भुस्खलन या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेला ये-जा करण्यासाठी दळणवळणांच्या साधनांमध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे या परीक्षांच्या तारखेत बदल करण्याच्या संघटनांच्या मागणीनुसार पुन्हा एकदा ही तारीख बदलण्यात आली आहे. 12 ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार असून या पूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेश पत्र ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद उपायुक्त शैलजा दराडे यांनी जाहीर केले आहे.