गुरु तेग बहादूर यांचे 400 वे प्रकाश वर्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शीख गुरु तेग बहादुर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजधानी नवी दिल्लीतील शीशगंज गुरुद्वारात पोहोचून नमन केले आहे. यादरम्यान त्यांनी देशाच्या भल्यासाठी प्रार्थनाही केली आहे.
लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागू नये म्हणून पंतप्रधानांनी सुरक्षा मार्ग सतेच विशेष सुरक्षा व्यवस्थेशिवयाच गुरुद्वाराचा दौरा केला आहे. यादरम्यान पंतप्रधानांच्या कुठल्याही दौऱयापूर्वी असणारी सुरक्षा व्यवस्था यावेळी नव्हती.
तत्पूर्वी पंतप्रधानांनी प्रकाशोत्सवानिमित्त एक शुभेच्छा संदेशही प्रसारित केला होता. गुरु तेग बहादुर यांच्या 400 व्या प्रकाशोत्सवाच्या विशेष दिनी मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोच्च बलिदान अनेक लोकांना शक्ती आणि प्रेरणा देत असल्याचे मोदींनी संदेशात म्हटले आहे.
इस्लाम धर्म न स्वीकारल्याने गुरु तेग बहादुर यांच्यासह त्यांच्या अन्य शिष्यांची मुगल शासक औरंगजेबाच्या आदेशावरून हत्या करण्यात आली होती असे सांगण्यात येते. यापूर्वीही औरंगजेबाने धर्मांतरासाठी गुरु तेग बहादुर यांना अनेक प्रकारची प्रलोभने दाखविली होती. गुरुसमोरच त्यांच्या शिष्यांच्या निर्घृण हत्येची भीती दाखविण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. पण तरीही गुरु तेग बहादुर हे स्वतःच्या कर्तव्यपथावरून हटले नाहीत. याचमुळे हा गुरुद्वारा जगभरातील लोकांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे.