सोशल डिस्टन्सीचे तीनतेरा : पोलिसांनी पाडला बाजार बंद
प्रतिनिधी / म्हापसा
शुक्रवारच्या म्हापसा बाजाराच्या दिवशी पुरुमेंतचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत एकच गर्दी केल्याने अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमलेल्या विक्रेत्यांना हाकलून लावले. यावेळी पोलिसांना बरीच धावपळ करावी लागली.
म्हापसा बाजारपेठ शुक्रवारी भरणार नाही कुणीही विक्रेत्यांनी म्हापसा बाजारपेठेत आपले सामान घेऊन येऊ नये असे आवाहन पालिकेच्या वतीने गुरुवारी सायंकाळी मार्केट निरीक्षकांनी केले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पालिका कर्मचारी येऊन दररोजच्या ठिकाणी कुणालाही बसण्यास देण्यात आले नाही. मात्र म्हापसा अर्बन बँक ते जुने आझिलो दरम्यान दोन्ही बाजूंनी आपले सामान घेऊन नागरिक विक्रीस बसल्याने म्हापशात या परिसरात सकाळी 7 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान नागरिक खरेदीसाठी जत्रेचे स्वरूप आले होते. कोरोनाची भीती कुणीही न बाळगता व सोशल डिस्टन्सीची तमा न करता सर्वांनी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली.
गेल्या शुक्रवारी बाजारपेठेत नागरिकांनी एकच गर्दी केल्याने बाजारपेठ अवघ्या अर्ध्या तासात बंद पाडण्यात आली होती. आज तसा प्रकार घडू नये म्हणून पालिकेने पूर्वीच बाजारपेठ बंद राहणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र सर्व व्यापाऱयांनी बाजारपेठेत न बसता आपली वाट पुढे अर्बन बँकेच्या पुढे रस्त्यावर धरल्याने येथे एकच गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. राज्यात कोरोनाचे आठ रुग्ण सापडले असले तरी कुणीही याबाबत गंभीर नसल्याचे पहायला मिळाले. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर 100 ने पोलीस तेथे दाखल झाले मात्र त्यांनी तेथे उभे राहून विक्रेत्यांना पाहणेच पसंत केले. हळूहळू सोशल मिडीयावरून बाजारातील गर्दीचे फोटो व्हायरल होऊ लागल्यावर पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या आदेशानुसार अन्य पोलीस फौजफाटा घटनास्थळी पाठविण्यात आला व सर्व विक्रेत्यांना दम देऊन बाजूला करण्यात आले व बाजार बंद पाडण्यात आला.
आमच्याकडून पैसे आकारले मग तुम्ही आम्हाला का उठवता. विक्रेत्यांनी केला पोलिसांना प्रश्न.
दरम्यान म्हापसा पालिकेच्या वतीने सोपो म्हणून प्रत्येक विक्रेत्याकडून बसण्यासाठी 50 ते 200 रुपये आकारले आहे. एरवी स्लीपवर 50 रुपये दाखविण्यात आले आहे मात्र पैसे घेताना तीप्पट म्हणजे 150 रुपये घेण्यात आले हे कोणत्या कायद्याने घेण्यात आले असा प्रतिसवाल करताना मासे विक्रेता समीर म्हापसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पालिकेने दिलेल्या पावत्याही त्यांनी पत्रकारांना दाखविल्या. दरम्यान आम्ही स्थानिक नागरिक आहोत. आम्हाला येथे बसण्यासाठी पालिकेने प्रत्येकी 150 ते 200 रुपये अकारले आहेत मग तुम्ही कोणत्या कायद्याने आम्हाला उठायला लावतात असा प्रतिसवाल काही विक्रेत्यांनी पोलिसांना केला व पालिकेच्या पावत्याही डय़ुटी बजावत असलेल्या पोलिसांना दाखविल्या. त्यामुळे पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. असे असल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई कसे करणार असे पोलीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
गोव्याच्या बॉर्डरवरून गावठी मिरची दाखल
बांदा तसेच केली सांखळी येथील बॉडरवरील काही गाडय़ा मिरची घेऊन म्हापशात आपापल्या रीक्षेने विक्री करण्यास आले होते. त्या मिरच्या 350 रुपये प्रति किलो अशा विकल्या गेल्या. स्वस्त दर पाहून मिरची (गावठी) खरेदी करण्यासाठी टॅम्पो मागे नागरिकांनी एकच गर्दी केली. येथे सोशल डिस्टन्सीचाही अभाव होता. सकाळी 6 वा. भरलेला हा खास बाजार पोलीस आल्यावर 8.30 पर्यंत संपला. पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी काही नागरिकांनी केली.
सोशल डिस्टन्सीचे तीनतेरा
दरम्यान शुक्रवारची गर्दी पाहता म्हापशात सोशल डिस्टन्सीचे तीनतेरा वाजल्याचे आढळून आले. आजच्या गर्दीत कोरोना या महाभयंकर रोगाबाबत कुणीच गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून आले. येथे झालेल्या एकच गर्दीमुळे अनेकांनी फोटो घेऊन ते सोशल मिडीयावर व्हायरल केले. कुणीच सोशल डिस्टन्स पाळले नव्हते. जो तो आपला माल लवकर कसा खपेल व आपणास सर्वात प्रथम वस्तू कशी मिळेल या बेतात होते. कुणालाही गांभीर्य नव्हते. शिवाय अनेक जणांनी मास्क आपल्या तोंडाला परिधान केले नव्हते असे आढळून आले.
कोविडचा बॉम्ब राज्यात फुटला तर नियंत्रण येणे कठीण– विनायक नाईक
यावेळी आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना म्हापसा येथील नागरिक विनायक नाईक म्हणाले की, आज शुक्रवारचा बाजार असून लोकांनी पुरुमेंतचे सामान खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. कुणीही सोशल डिस्टन्सचे पालन करताना दिसत नाही. त्यांनी बरोबर अंतर ठेवून येथे विक्रीस बसणे गरजेचे आहे. हे लोकांना कळायला पाहिजे. कुणीही जबाबदारीने वागत नाही. कोविड केसेस राज्यात आढळून आल्या आहेत. राज्यात जर हा कोविडचा बॉम्ब फुटला तर तो नियंत्रणात येणे कठीण बाब आहे. सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे आणि काळाची गरज आहे असे नाईक म्हणाले.
म्हापशात बोडगेश्वराच्या खुल्या मैदानात शुक्रवारचा बाजार भरावा– बाळा नाईक
वेर्ला काणका पंचायतीचे पंच सदस्य बाळा नाईक म्हणाले की, या दिवसात वार्षिक आमचा पुरुमेंतचा बाजार भरतो मात्र लॉकडाऊन असल्याने सर्वांनाच प्रॉब्लम झाला आहे. आज गर्दीमुळे बाजारपेठ म्हापशात पोलिसांनी बंद पाडली. सर्वांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी एक सिस्टम ठेवणे गरजेचे आहे अन्यथा पुरुमेंतचा बाजार कुणीही नेऊ शकणार नाही. अन्यथा हा बाजार म्हापसा बोडगेश्वराच्या खुल्या मैदानावर सोशल डिस्टन्सी ठेवून करावा जेणेकरून याचा पोलिसांना अन्य कुणालाही त्रास होणार नाही असे पंच बाळा नाईक म्हणाले.