सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी झालेल्या आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवार दि. 17 रोजी संपूर्ण सीमाभागात हुतात्मा दिनाचे आचरण करण्यात येणार आहे. या हुतात्मादिनी संपूर्ण सीमाभागातील जनतेने हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सकाळी 9 वा. येथील हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
दि. 16 जानेवारी 1956 रोजी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी राज्य पुनर्रचना मंडळाचा अहवाल स्विकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्या घोषणेमुळे सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्याच्या कृतीचा वरवंटा फिरविला गेला. मराठी भाषिकांचा असणारा बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर भालकी हा प्रदेश कर्नाटकात डांबला गेला. या कृतीविरोधात संतापाचा आगडोंब उसळला. दि. 17 जानेवारी 1956 रोजी बेळगावात झालेल्या आंदोलनात चौघांचा बळी गेला. या प्रश्नासाठी मारूती बेन्नाळकर, मधु बांदेकर, लक्ष्मण गावडे, महादेव बरागडी आणि निपाणी येथे कमळाबाई मोहिते यांनी हौतात्म्य पत्करले. तसेच या सत्याग्रहातील सहभागी नागाप्पा होसूरकर, बाळू निलजकर, गोपाळ चौगुले, यांचाही नंतर कारागृहात मृत्यू झाला. या सर्व हुतात्म्यांना शुक्रवारी अभिवादन करण्यात येणार आहे. सीमाबांधवांनी आपापले सर्व व्यवहार बंद ठेवावेत. तसेच हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हुतात्मादिनी हुतात्मा चौक येथे सकाळी 9 वाजता हुतात्म्यांना अभिवादन होणार आहे. त्यानंतर तेथून मूक फेरीस प्रारंभ होणार असून, मध्यवर्ती भागामध्ये फिरून या फेरीची सांगता हुतात्मा चौक येथे होणार आहे. याची नोंद घेऊन म. ए. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी येथे मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहर म. ए. समितीचे आवाहन
सीमालढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी म. ए. समिती कार्यकर्त्यांनी सकाळी 9 वाजता हुतात्मा चौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन शहर म. ए. समितीतर्फे करण्यात आले आहे. शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर, उपाध्यक्ष टी. के. पाटील, सरचिटणीस किरण गावडे, माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेवक पंढरी परब, बाळासाहेब काकतकर, गजानन धामणेकर आदिंनी केले आहे. महिला आघाडीच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्षा रेणु केल्लेकर यांनी केले आहे.
हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी होऊन हुतात्म्यांना अभिवादन करावे. असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर व इतर पदाधिकाऱयांनी केले आहे.