वार्ताहर / पाचगाव
शेंडा पार्कमधील 90 एकर मधील सुमारे 20 हजार झाडे सोमवारी दुपारी लागलेल्या आगीमध्ये जळून भस्मसात झाली. यामुळे शेंडा पार्क मध्ये ऑक्सिजन पार्कचे नागरिकांचे स्वप्नदेखील भस्मसात झाले.
शेंडा पार्कमधील कृषी विद्यापीठाच्या ताब्यातील 90 एकर माळावर तीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून सुमारे 35 हजार झाडे प्रशासनाने लावली होती. तीन वर्षांमध्ये या झाडांची वाढ देखील व्यवस्थित झाली होती . या झाडांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते. हे गवत आता पूर्णपणे वाळले होते.या गवताची कापणी देखील सुरू होती. हे कापलेले गवत या परिसरातच रचून ठेवले होते . सोमवारी प्राथमिक अंदाजानुसार आर के नगर पेट्रोल पंपकडील बाजूस कचरा जळत होता.
त्या मधून ही आग लागली असण्याची शक्यता आहे. या गवताला आग लागली आणि या आगीमध्ये या परिसरातील सुमारे 20 हजार झाडे जळून नष्ट झाली. अग्निशामक दलाच्या 4 गाड्या व स्थानिक तरुणांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले . मात्र या परिसरात चढ उतार असल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांच्या व स्थानिक तरुणांच्या प्रयत्नांना मर्यादा येत होत्या. ही झाडे वाढावीत यासाठी वनविभागाने तीन वर्षापासून प्रयत्न केले होते. या झाडांना उन्हाळ्यामध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. झाडांची वाढ व्यवस्थित व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. मात्र या आगीमुळे प्रशासनाचे प्रयत्न वाया गेले.या आगीमुळे हजारो झाडे नष्ट झाली. त्याच बरोबर तीन वर्षापासून शासनाने ही झाडे लावण्यासाठी व त्यांच्या वाढीसाठी लाखो रुपये खर्च केले होते ते देखील वाया गेले. या आगीमध्ये अनेक लहान-मोठे पक्षी ही जळून खाक झाले. हे गवत ओले असताना कापले असते तर ही दुर्घटना घडली नसती अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
कृषी विद्यापीठाचे दुर्लक्ष
वाळलेल्या गवतामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे गवत लवकरात लवकर काढून घ्यावी असे कृषी विद्यापीठाला दोन वेळा कळवले होत. मात्र याकडे कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याचे वनपाल एस बी देसाई यांनी सांगितले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा
काही दिवसांपूर्वी या परिसरात आग लागली होती . तेव्हा अग्निशामक दलाने या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले होते .त्यामुळे त्या वेळी झाडांचे जास्त नुकसान झाले नव्हते . संबंधित अधिकाऱ्यांनी यातून धडा घेऊन योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हजारो झाडे भस्मसात झाली.- संग्राम पोवाळकर ,माजी उपसरपंच पाचगाव .