वार्ताहर / पाचगाव
शेंडा पार्क येथे 90 एकरमध्ये 40 हजार झाडे लावण्यात आली आहेत. मात्र या परिसरात गाई, म्हशींचा मुक्त वावर सुरू असून त्यांच्याकडून ही झाडे फस्त करण्याचा प्रकार सुरू आहे. शेंडा पार्क परिसरात सुमारे 40 हजार झाडे लावण्यात आली आहेत. डिसेंबर महिन्यात लागलेल्या आगीत या पैकी सुमारे 20 हजार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आमदार ऋतुराज पाटील आणि काही स्वयंसेवी संस्था स्वखर्चातून ही झाडे जगवण्यासाठी टँकरद्वारे या झाडांना पाणी देऊन त्यांना नवसंजीवनी दिली. मात्र त्यानंतर वन विभागाकडून या झाडांना अध्याप पाणी घालण्यात आलेले नाही. या परिसरात गाई म्हशींचा मुक्त वावर सुरू आहे.
त्यामुळे या जनावरांकडून जी झाडे जगली आहेत तीही फस्त करण्याचा प्रकार सुरू आहे. आमदार ऋतुराज पाटील आणि सामाजिक संघटनांच्या झाडे जगवण्याच्या प्रयत्नांना खीळ बसत आहे. 90 एकर परिसरात 40,000 झाडे लावण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च केले आहेत. डिसेंबर महिन्यात या परिसरात लागलेल्या आगीत अनेक झाडे भस्मसात झाली जी झाडे जगली आहेत ते वन विभागाच्या दुर्लक्षामुळे जनावरे खाऊन टाकत आहेत. यामुळे शासनाचे या झाडांवर खर्च केलेले लाखो रुपये वाया जात आहेत. वनविभागाकडून या झाडांची काळजी घेण्यात दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
या झाडांच्या वाढीकडे आणि संरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. झाडांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वखर्चातून दररोज 15 टँकरद्वारे या झाडांना पाणी दिले आणि ती जगवली. मात्र वन विभागाचे अधिकारी या झाडांचे संरक्षण करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा अधिकार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुशांत शेटगे माजी उपसरपंच यांनी केली आहे.
पाचगाव झाडांना पाण्याची गरज
शेंडा पार्क मधील 20 हजार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती .आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून या झाडांना पाणी घातले. त्यामुळे काही झाडे जगली मात्र त्यानंतर वनविभागाने या झाडांना पाणी देण्याकडे आणि त्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष लक्ष केले आहे . या झाडांना पाण्याची गरज आहे.