वार्ताहर/ तवंदी
शेंडूर येथील रासाई मंदिराकडे जाणाऱया रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करण्यास कठीण बनत आहे. यामुळे रस्त्याची पुनर्बांधणी होणे गरजेचे असून यासाठी ग्रा. पं., जि. पं. तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
शेंडूर हे गाव डोंगराळ भागात येते. या गावची लोकसंख्या 3 हजारच्या आसपास आहे. शेंडूर डोंगरमाथ्यावर असलेले रासाई मंदिर हे ग्रामदैवत आहे. येथे ग्रामस्थांची दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवार, रविवार, पौर्णिमा, अमावस्येला गर्दी असते. मात्र, मंदिराकडे जाण्यासाठी जवळपास दीड कि. मी.चे अंतर आहे. पण, गत काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ये-जा करण्यास अडचणी येत आहेत.
त्याचबरोबर भोकरभावी, साखरभावी, कामत हा रस्तादेखील व्हावा, अशी मागणी येथील शेतकऱयांतून होत आहे. गतवर्षी शेतकऱयांनी सुमारे एक कि. मी. रस्त्याची दुरुस्ती श्रमदानातून केली होती. पण, अद्याप शेतकऱयांना जाण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे हा रस्तादेखील हावा, अशी मागणी होत आहे. या भागात जवळपास 200 एकर शेती आहे. हा रस्ता झाल्यास शेतकऱयांसाठी सोयीस्कर होणार आहे.