पुढील काही वर्षात साध्य होणार उद्दिष्ट ?
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजाराने 24 सप्टेंबरला ऐतिहासिक 60,000 अंकांची विक्रमी पातळी गाठल्यानंतर गुंतवणूकदारांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या अनुषंगाने पाहता येणाऱया काळामध्ये भारतीय शेअर बाजार हा एक लाख अंकांचा न भुतो न भविष्यती असा आकडा प्राप्त करणार असल्याचा अंदाज काही तज्ञांनी वर्तविला आहे.
सदरचा एक लाखाचा नियोजित टप्पा हा पुढील काही वर्षांमध्ये साध्य केला जाऊ शकतो, असेही तज्ञांनी म्हटले आहे. 50 हजार अंकांपासून ते 60 हजार अंकांपर्यंतचा टप्पा सेन्सेक्स निर्देशांकाने केवळ वर्षभरामध्ये गाठला असल्याने तज्ञांनी वरील नवा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक स्तरावरील गुंतवणुकदारांचा कलही भारतीय शेअर बाजाराकडे नव्याने झुकताना दिसतो आहे. याचा फायदा घेत भारतीय शेअर बाजार अलीकडच्या काळामध्ये चांगलीच मजल मारताना दिसतो आहे. असे जरी असले तरी काहीशा प्रमाणामध्ये बाजार कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगायला हवी. याआधी 2003 ते 2007 या काळामध्ये भारतीय शेअर बाजारात अशीच काहीशी तेजी अनुभवायला मिळाली होती. अलीकडचा बाजारातील तेजीचा कलही नेमका तसाच दिसतोय.