2019 साठीचा पुरस्कार ओमानच्या दिवंगत राजांना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय विदेश मंत्रालयाने सोमवारी रात्री उशिरा गांधी शांतता पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित केली आहेत. 2020 सालासाठी हा पुरस्कार बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे वंगबंधू शेख मुजीबुर्रहमान यांना जाहीर झाला आहे. त्यांना हा पुरस्कार अहिंसक आणि गांधीवादी मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी देण्यात येणार आहे. तर 2019 च्या गांधी शांतता पुरस्कारासाठी ओमानचे राजे कबूस बिन सैद अल सैद यांची निवड झाली आहे.
भारत सरकार 1995 पासून हा पुरस्कार प्रदान करत आहे. या पुरस्काराची सुरुवात महात्मा गांधी यांच्या 125 व्या जयंतीवेळी करण्यात आली होती. हा पुरस्कार कुठलेही राष्ट्रीयत्व, वंश, भाषा, जात किंवा पंथाच्या व्यक्तीला दिला जाऊ शकतो. हा पुरस्कारासाठी नावांची निवड ज्युरी करतात. ज्युरींचे अध्यक्षत्व पंतप्रधानांकडे असते. या पुरस्काराच्या अंतर्गत 1 कोटी रुपये आणि प्रशस्तीपत्र देण्यात येते.
कोरोना संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच्या पहिल्या विदेश दौऱयाच्या अंतर्गत बांगलादेशात जाणार आहेत. 25 मार्चपासून सुरू होणाऱया दौऱयात ते शेख मुजीबुर्रहमान यांच्या जन्मशताब्दी सोहळय़ात ते सामील होणार आहेत. पाकिस्तानपासून स्वतंत्र होत निर्माण झालेल्या बांगलादेशचे मुजीबुर्रहमान हे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी पाकिस्तानविरोधी लढय़ाचे नेतृत्व करत बांगलादेशला मुक्ती मिळवून दिली होती. त्यांना वंगबंधू या पदवीने सन्मानित करण्यात आले होते.
शेख मुजीबुर्रहमान आणि त्यांच्या कुटुंबाची 15 ऑगस्ट 1975 रोजी हत्या करण्यात आली होती. बांगलादेशात नसल्याने त्यांच्या दोन्ही मुली या हल्ल्यातून बचावल्या होत्या. बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान शेख हसीना या वंगबंधूंच्या कन्या आहेत.
ओमानचे राजे कबूस बिन सैद अल सैद यांचे मागील वर्षी जानेवारीमध्ये निधन झाले होते. 23 जुलै 1970 रोजी ते ओमानचे राजे झाले होते. जिवंत असेपर्यंत त्यांनी हे पद सांभाळले होते. सैद हे अविवाहित होते. कबूस यांना करिष्माई आणि द्रष्टे नेते मानले जायचे.