वार्ताहर/ दुशेरे
शेणोली (ता. कराड) येथील रेल्वे स्टेशनमधून सातारा बाजूच्या लोहमार्गावर विजेवर चालणारी रेल्वे धावण्यात आली. शेणोलीपासून कोरेगावपर्यंत साठ किलोमीटर अंतराच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. शनिवारी या मार्गावर विजेवरील रेल्वे इंजिनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. हे इंजिन ताशी 110 किलोमीटर वेगाने धावले असून, विद्युतीकरणाचे काम यशस्वी झाल्याचे मत रेल्वेच्या वरिष्ठांनी तपासणीवेळी नोंदवले आहे.
केंद्रीय रेल्वे खात्याने पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे मार्गांचे मजबुतीकरण हाती घेतले आहे. त्यामध्ये पुणे-मिरज-कोल्हापूर या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात शेणोली ते ताकारीपर्यंत लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पायलट प्रोजेक्ट म्हणून करण्यात आले. त्या कामानंतर दुहेरीकरण व विद्युतीकरण कामाला सुरुवात झाली. शेणोली ते भिलवडी या टप्प्यात दुहेरीकरण व कोल्हापूरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. शेणोलीपासून सातारा व सातारा ते पुणे या दोन टप्प्यात सध्या विद्युतीकरण सुरू आहे. पावरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व भारत सरकारच्या महारत्न कंपनीने 326 किलोमीटरचे विद्युतीकरण कमी वेळेत पूर्ण केले आहे.
त्यामधील सातारा सेक्शनमधील 68 किलोमीटर अंतराच्या कामाचे कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टी मनोज अरोरा यांनी निरीक्षण केले. यावेळी प्रिन्सिपल चीफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर गोपाल चंद्रा, वरिष्ठ डिव्हीजनल इलेक्ट्रिकल इंजिनिअर जे. पी. मिश्रा, पुणेच्या डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा, पावरग्रीडचे अधिकारी ए. सुरेंद्रम, टी. आर. कृष्णाराम, अजय भुसकट, आर. आर. यादव, कल्पतरू कंपनीचे अधिकारी सुरेश पनवार, पी. के. झा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या झालेल्या चाचणीत कोरेगावपर्यंत झालेल्या कामाची तपासणी व रेल्वे इंजिनच्या वेगाची तपासणी करण्यात आली. यावेळी रेल्वेच्या वरिष्ठांनी कोरेगाव, तारगाव येथील स्टेशनवर थांबून विद्युतीकरण कामाची तपासणी केली. शेणोली स्टेशन येथे इंजिनची वेग क्षमता चाचणी केली. सुरुवातीस सजवलेल्या इंजिनला हिरवा झेंडा दाखवला. अधिकाऱयांनी त्या इंजिनमधून कोरेगावकडे प्रवास केला. यामध्ये तासी 110 किलोमीटर धावण्याचा इंजिनचा वेग असल्याचे निरीक्षण नोंदवले.