प्रतिनिधी / शिराळा
शिराळा तालुक्यातील अनेकांनी कामानिमित्त मुंबईला स्थलांतर केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी नवी मुंबई येथील फळांचे व्यापारी सुरेश महादेव पाटील हे त्यापैकीच एक
कर्नाटकमधील शिरगुप्पी येथील प्रगतशील शेतकरी अनिल व सूनील चौगुले गेल्या १८ वर्षांपासून सुरेश पाटील यांना पपई पाठवतात. शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील हा सौहार्दपूर्ण व्यापार नव्या वर्षात सुरू राहणार की, थांबणार ? हे नव्या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे. दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही शेतकरी-व्यापारी स्नेहभेट होते. यावर्षीसुद्धा ही अनोखी परंपरा कायम आहे. शेतकऱ्यांकडून असेही ऋणानुबंध जपले जात आहेत.
शिराळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची पोरं मुंबईत जाऊन व्यापारी झाली. पण शेतीविषयी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देणे. वेळेत पैसे परत करणे , अडीनडीला कधीही आर्थिक मदत करणे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील संबंध जिव्हाळ्याचे होत गेले. हा जिव्हाळा, आपुलकी जपण्यासाठी सूनील आणि अनिल चौगुले हे शेतकरी दरवर्षी वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई येथे येऊन फळांचे व्यापारी सुरेश महादेव पाटील यांचा सत्कार करतात.
ही परंपरा गेली अठरा वर्षे सुरू आहे
नव्या कृषी कायद्याने शेतकरी आणि व्यापारी संबंधावर परिणाम होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी एकदा माल पाठवल्यानंतर त्यांच्या पैशाची हमी असते. देशात सुरू असलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनास शेतकरी आणि व्यापारी दोघांचाही विरोध आहे. या कायद्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत्या हद्दपार होणार आहेत. परिणामी शेतकरी आणि व्यापारी यांचे स्नेहबंध तुटणार आहेत. ही व्यवस्था मोठ्या भांडवलदारांच्या हातात जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिली.
सुरेश पाटील हे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी गावसोडून मुंबईत गेले. सुरूवातीला मिळेल ते काम केले. त्यांचा गेल्या पंचवीस वर्षांत , एका सामान्य शेतकऱ्याचे पोरगं ते एक व्यापारी हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.विशेष म्हणजे त्यांचं शिक्षण दहावी पर्यंत झाले आहे.तरीही आज ते चांगला व्यापार करत आहेत. त्यामुळेच शेतकरी हजारो किलोमीटरचा प्रवास करून दरवर्षी हा जिव्हाळा जपत आहेत.