ऑनलाईन टीम / जालना :
दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
जालना जिल्ह्यातील टाकळी कोलते गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला. या देशात आधी सिएए आणि एनआरसीमुळे उचकवण्यात आले. पण यामुळे या एक तरी मुस्लिम देशाबाहेर गेला का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. केंद्र सरकार स्वतःच्या तिजोरीतुन शेतकऱ्यांच्या हितासाठी पैसे खर्च करायला तयार आहे. पण बाकीच्या लोकांना हे मान्य नसून सध्या शेतकऱ्यांचे सुरु असलेल आंदोलन हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
ते म्हणाले, हे आंदोलन बाहेरच्या देशाचे षडयंत्र असून आपल्या देशातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे, असेही दानवे यांनी सांगितले. आंदोलन करणारे लोक हे सुटाबुटातील लोक आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका, असे आवाहन देखील दानवे यांनी केले आहे.
…हा शेतकऱ्यांचा अपमान : बच्चू कडू
दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा संताप व्यक्त करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले की, सर्व देशभरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे म्हणणे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणे गरजेचे आहे, असेही बच्चू कडू यांनी यावेळी म्हटले.