ग्रेटा थनबर्ग अन् रिहानाकडून आंदोलनाचे समर्थन, तर सचिन तेंडुलकर, अक्षयकुमार सरकारच्या समर्थनात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शेतकरी आंदोलन बुधवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे. जगातील काही मोठय़ा व्यक्तींनी आंदोलक शेतकऱयांना पाठिंबा दर्शविला आहे. तर भारतातील वलयांकितांनी प्रत्युत्तर देत दिशाभूल करण्याच्या प्रयत्नांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. स्वतःचे म्हणणे मांडण्यापूर्वी विषय समजून घ्या असे विदेश मंत्रालयाने विदेशी व्यक्तींना सुनावले आहे. तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि चित्रपट अभिनेता अक्षयकुमार यांनी भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये विदेशी लोकांनी हस्तक्षेप करू नये, असे ठणकावले आहे.
वलयांकितांच्या विधानाची सुरुवात 32 वर्षीय पॉपस्टार रिहानापासून झाली आहे. रिहानाचे केवळ ट्विटरवरच 11 कोटी फॉलोअर्स आहेत. आम्ही भारतातील शेतकरी आंदोलनावर का बोलत नाही आहोत असे तिने ट्विट करत म्हटले होते. तिच्या या पोस्टला 2.20 लाख जणांनी री-ट्विट केले आहे. मंगळवारी रात्री उशिरा नॉर्वेतील 18 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तर बुधवारी पहाटे अमेरिकन अभिनेत्री अमांडा कर्नी हिने आंदोलनात सामील महिलांचे छायाचित्र प्रसारित केले आहे. जग तुम्हाला पाहत असून हा मुद्दा समजून घेण्यासाठी भारतीय, पंजाबी किंवा दक्षिण आशियाई असण्याची गरज नाही. केवळ माणुसकीची काळजी करण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रसारमाध्यम स्वातंत्र्य, मूलभूत मानवाधिकार आणि नागरी अधिकारांच्या स्वातंत्र्याची मागणी करा असे कर्नीने म्हटले आहे.
त्यानंतर पॉर्नस्टार मिया खलिफानेही दिल्लीनजीकच्या परिसरातील इंटरनेट बंदीवर टिप्पणी केली आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची पुतणी आणि लेखिका मीनाने यावर आंदोलनाच्या बाजूने आणि सरकारच्या विरोधात मत मांडले आहे.
कंगनाने सुनावले
रिहानाला सर्वप्रथम अभिनेत्री कंगना रनौतने सुनावले आहे. आम्ही तुम्हा लोकांप्रमाणे आमचा देश विकत नाही आहोत. हिंसाचार फैलावणारे लोक शेतकरी नसून दहशतवादी असल्याचे कंगनाने म्हटले. ग्रेटाच्या विधानावरही कंगनाने कोईम्बतूर येथील 105 वर्षीय पप्पम्माल यांचा उल्लेख केला. पप्पम्माल या सेंद्रीय शेती करतात. आमच्या आजीविषयी कुठलीच ‘फॅन्सी’ ऍक्टिव्हिस्ट बोलणार नाही, पण लोक लाडात वाढून बिघडलेल्या ग्रेटाला प्रसिद्धी देतील असे प्रत्युत्तर कंगनाने दिले आहे.
बोलण्यापूर्वी मुद्दा जाणून घ्या
समाजमाध्यमांवर वाढता रागरंग पाहता विदेश मंत्रालयाला टिप्पणी करावी लागली आहे. अशाप्रकरणांवर मत व्यक्त करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्या आणि मुद्यांना चांगल्याप्रकारे समजून घ्या. समाजमाध्यमांवर खळबळजनक हॅशटॅग आणि टिप्पणींसोबत प्रसिद्ध व्यक्ती आणि अन्य लोक जोडले गेल्यास त्यांना मोठी प्रसिद्धी मिळते. पण त्यांचे विधान अचूक नसते आणि जबाबदारीने केलेलेही नसते असे विदेश मंत्रालयाने ठणकावले आहे. देशाच्या संसदेने कृषिक्षेत्राशी संबंधित सुधारणावादी कायद्यांना पूर्ण चर्चेनंतरच संमत केले होते. तरीही स्वतःचा लाभ पाहणाऱया गटांनी भारताच्या विरोधात मोर्चा उघडला असल्याचे विदेश मंत्रालयाकडून म्हटले गेले.
भारतीय महनीय सरसावले
विदेशी महनीयांना विदेश मंत्रालयाने फटकारल्यावर आता अशा विदेशी लोकांविरोधात स्वतःचे मत मांडणाऱयांमध्ये अक्षय कुमार आघाडीवर राहिला. विदेश मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेल्या हॅशटॅगइंडियाटुगेदरशी जोडून घेत अक्षयने शेतकरी आमच्या देशाचा महत्त्वाचा हिस्सा असून त्यांच्याशी संबंधित मुद्दे सोडविण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. आमच्यात दरी निर्माण करणाऱयांवर लक्ष देण्याऐवजी आम्ही या मुद्यांवर तोडग्याची अपेक्षा करुया असे त्याने नमूद केले आहे.
सचिननेही विदेशी शक्तींना फटकारले
भारताच्या सार्वभौमत्वाशी कुणीच खेळू शकत नाही. विदेशी शक्ती केवळ बाहेरून पाहू शकतात, हिस्सेदार होऊ शकत नाहीत. भारतीयच भारताला ओळखतात आणि त्यांनीच भारतासंबंधी निर्णय घ्यावेत अशा शब्दांत भारतरत्न सचिन तेंडुलकरने विदेश मंत्रालयाला मोहिमेला पाठिंबा दिला आहे.
अजय देवगण, एकता कपूरही सोबत
अभिनेता अजय देवगण आणि निर्माती एकता कपूरने कुठल्याही दुष्प्रचाराला बळी न पडता एकजूट राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. नेहमी मोठा दृष्टीकोन ठेवायला हवा. अर्धसत्यापेक्षा अधिक धोकादायक काहीच नसते असे म्हणत सुनील शेट्टीने विदेशी व्यक्तींना सुनावले आहे.
भारताची एकता अभेद्य
भारतीय कलाकारांकडून मिळालेल्या समर्थनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भूमिका मांडली आहे. कुठलाच दुष्प्रचार भारताची एकता तोडू शकत नाही. भारताला नव्या उंचीवर जाण्यापासून रोखू शकत नाही. दुष्प्रचार नव्हे तर विकासच भारताचे भविष्य निश्चित करू शकतो असे उद्गार शाह यांनी काढले आहेत.