ऑनलाईन टीम/ तरुण भारत
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा कंबर कसून कामाला लागली आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाला आपला दृष्टीकोन बदलण्याचा सल्ला दिला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरएसएसने पक्षाला आपली रणनीती ठरवण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. सध्या देशापुढे असलेल्या प्रश्नांप्रती अधिक संवेदनशील होण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोलून दाखवली आहे. उत्तरप्रदेशातले मंत्री आणि पक्षाचे काही नेते यांच्यासोबत नोएडामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांनी उत्तरप्रदेशात चाललेल्या शेतकरी आंदोलनाला शांतपणे हाताळावे, तसंच त्याबद्दल संवेदनशील भूमिका घ्यावी, असा सल्ला यावेऴी त्यांनी दिलाय.
नोएडा येथे उत्तर प्रदेशचे मंत्री आणि पक्षाच्या काही नेत्यांसोबत आरएसएसच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, पश्चिम-उत्तर प्रदेशमध्ये कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे त्याठिकाणी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पश्चिम उत्तर प्रदेश भागातील खासदार आणि आमदारही या बैठकीला उपस्थित होते. यापूर्वीही आरएसएसने शेतकरी आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच सत्ताधारी पक्ष उत्तर प्रदेशात काही भागात वास्तव्यास असणाऱ्या शीख आणि जाट समुदायाच्या लोकांसोबत शत्रूत्व ओढवून घेत आहे. त्याचा धोका भाजपला होऊ शकतो, असेही आरएसएसचे म्हणणे आहे. तसेच आंदोलक शेतकऱ्यांबाबत शांततेची भूमिका घेणे गरजेचे आहे, असेही संघाचे संयुक्त सरचिटणीस कृष्ण गोपाल यांनी सांगितले.