प्रतिनिधी/ कराड
दिल्ली येथे शेतकऱयांचे आंदोलन हिंसक होण्याला संपूर्णपणे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, असं म्हणत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या घटनेची तीव्र शब्दात निंदा करत असून, मोदी सरकारने हटवादीपणा सोडून कृषी विधेयक तत्काळ मागे घ्यावीत, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
मोदी सरकारने कायदे करताना कोणाशीही चर्चा केली नाही व हे अन्यायी कृषी कायदे शेतकऱयांवर लादले गेले. याआधीचे मनमोहन सिंह व वाजपेयी सरकार कोणतेही कायदे करताना सर्वांना विश्वासात घेऊन त्याची अंमलबजावणी केली जायची. कायदे मांडण्याआधी त्याची संसदीय समितीमध्ये चर्चा व्हायची, यामुळे त्या कायद्यांना सर्वसमावेशक मत असायचे. पण नरेंद्र मोदींनी चर्चेचा कोणताही मार्ग न अवलंबता कायदे घाईगडबडीने लादण्याचा मार्ग अवलंबला. केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे बहुमत नसताना पास केलेले आहेत. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने कडक थंडीमध्ये बसून आहेत. पंतप्रधानांना देशाचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे पण यामध्ये ते अपयशी ठरत आहेत.
टॅक्टर रॅलीदरम्यान अश्रुधुराचा वापर केला गेला, लाठीचार्जही करण्यात आला हे अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही आडमुठी भूमिका आहे. मोदींच्या हटवादीमुळे यातून काहीही तोडगा निघत नाही. राजधानी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी संपूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे, असे ते म्हणाले.