ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
शेतकऱ्यांची नाळ जमिनीशी जोडली गेली असल्याने जमिनीवर घट्ट रोवून शेतकऱ्यांनी कोरोना संकटाला तोंड दिले. देशातील शेतकरी कोणत्याही संकटाचा सामना प्रभावीपणे करू शकतो. हे शेतकरीच ‘आत्मनिर्भर भारता’चा आधार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी आज रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. मोदी म्हणाले, कोरोना काळात शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. कृषी क्षेत्र मजबूत व्हायला हवे. शेतीला जेवढी आधुनिक करू तेवढी ती फुलेल. शेती क्षेत्रात अनेक नवे बदल होत आहेत. या बदलांची चर्चा माझ्याशी शेतकरी संघटना करत असतात.
केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांनाही मोदींनी टोला लगावला. शेतकऱ्यांवरील बाजार समितीचे निर्बंध हटवल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. मात्र, विरोधकांना शेतकऱ्यांचे भले पाहवत नाही. ‘आत्मनिर्भर भारत’ बनवण्यात शेतकऱ्यांची मोठी भूमिका आहे, असेही मोदी म्हणाले.