कोल्हापूर/प्रतिनिधी
शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, साखर डायरीचे संपादक अजित नरदे यांचे आज, सकाळी निधन झाले. 30 ते 32 वर्षापूर्वी स्व. शरद जोशी यांच्या सोबत त्यांनी काम केले. अन्यायाविरूध्द वाचा फोडावी, यासाठी त्यांनी चळवळीमध्ये सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या या अकाली निधनाने शेतकरी चळवळीमध्ये कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे मत माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
अजित नरदे यांनी खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन करत जी. एम. तंत्रज्ञानचा वापर करावा, शेती क्षेत्रातील खुल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी त्यांनी आपली मते परखडपणे मांडली. कै. शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी चळवळीत कार्यरत असताना त्यांचा साखर उद्योगावरील गाडा अभ्यास वाखाण्याजागा होता. त्यांची साखर डायरीत अतिशय प्रसिध्द आहे. या डायरीच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण साखर कारखानदारीचा लेखाजोखा त्यांनी संग्रहीत केला होता. आजही साखर डायरीतील संग्राहाचा या उद्योगाला मार्गदर्शन होत आहे.
साखर उद्योगातील नेमक्या दुखण्यावर बोट ठेवत आपल्या लिखाणातून त्यांनी स्पष्टपणे वेळोवेळी प्रहार केला आहे. शेतकर्यांना न्याय मिळायचे असेल तर कारखानदारीवर वचक ठेवले पाहिजे. अवास्तव मागणी त्यांना कधीच पटत नव्हती. जेवढे मिळतयं तेवढं घ्यायचं, मात्र हे करत असताना शेतकर्यांच्यावर अन्याय कधी होऊ नये, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असायचे. त्यांच्या अभ्यासू लिखाणामुळे साखर उद्योगातील प्रश्न समोर आले. शेतकर्यांची बाजारपेठ ही ठराविक व्यापार्यांची मक्तेदारी अडकलेली आहे. ही मक्तेदारी मोडीत काढायची असेल तर खुली अर्थव्यवस्था निवडली गेली पाहिजे. त्यासाठी कै. जोशी यांनी मांडलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेचे वेळोवेळी समर्थन केले आहे. जी.एम. तंत्रज्ञानामुळे शेती उद्योगाला चालना मिळेल, जेणेकरून शेतकर्यांच्या उत्पन्न दुप्पट होईल, तसेच याचा लाभ शेतकर्यांना होईल, या उदात्त हेतूने त्यांनी जी.एम. बियाण्यांचं त्यांनी समर्थन केले होते. यासाठी त्यांनी अनेक परदेश दौरे केले होते.