बेळगाव/ प्रतिनिधी
शेतकऱयांनी पिकविलेले कृषी उत्पादन बाजारपेठेत आणण्यासाठी, खरेदीदारांची ओळख पटविणे आणि कृषी काम निरंतरपणे सुरू राहण्यासाठी आवश्यक उपाय योजना हाती घेण्यात याव्यात. तसेच शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टीने अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे अशी सूचना जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी अधिकारी वर्गास केली.
जिल्हय़ातील कृषी, बागायत, पशुसंगोपन, कृषी बाजारपेठ, केएमएफ आणि तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱयांशी गुरूवारी व्हीडिओ संवाद करण्यात आले. जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या या संवाद कार्यक्रमात जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी जिल्हय़ातील शेतकऱयांना पुढील दिवसात शेती संबंधी कोणत्याही कामात अडचण होऊ नये, या दृष्टीने अधिकाऱयांनी उपाय योजना कराव्यात अशी सूचना संबंधित अधिकाऱयांना केली. ग्राम स्तरावर टास्क फोर्सची स्थापना करण्यात यावी. शेतकऱयांनी पिकविलेल्या पिकांबाबतची माहिती एकत्रित करावी, शेतकऱयांनी पिकविलेल्या पिकांसाठी गावातूनच शेतकऱयांद्वारेच थेट विक्री करण्याची व्यवस्था करण्यात यावी. कृषी बाजारपेठेत येणाऱया विविध उत्पन्नांची खरेदी समर्पकरित्या होण्याकडे लक्ष देण्यात यावे, असेही त्यांनी अधिकाऱयांना सांगितले.
बागायतदार उत्पन्नांचे प्रमाण ओळखून बाजारपेठेची व्यवस्था करण्यात यावी. पुढील दिवसात बागायत रोपांची कमतरता भासू नये या दृष्टीने सर्व नर्सरींना मागणीनुसार पुरवठा करावा. कृषी खात्यांकडून सुरू करण्यात आलेल्या कृषी यंत्र धारा आणि रयत संपर्क केंद्राद्वारे शेतकऱयांना अनकुल ठरावे या दृष्टीने प्रयत्न करावेत. बी बीयाने, खते, कीटनाशक औषधांचा तुटवडा भासू नये याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. कोणत्याही जनावरांना त्रास होऊ नये या दृष्टीने पशु संगोपन खात्याद्वारे समर्पकरित्या चिकित्सा देण्यात यावी. जिल्हय़ात उत्पादित दूधाची केएमएफ डेअरी द्वारे विक्री करण्यात यावी, अशी सूचना सीईओ डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी यावेळी केली. याप्रसंगी जि. पं. चे अधिकारी एस. बी. मुळ्ळोळी उपस्थित होते