प्रतिनिधी/ वडूज
विद्यमान आघाडीचे ठाकरे सरकार व पाठीमागील फडणवीसांचे युती सरकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी गेंडय़ाची कातडी पांघरलेली असतात. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी सरकार प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी दबाव गटाची गरज आहे. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
वडूज येथील पंचायत समितीच्या सभापती निवासात आयोजित पत्रकार व शेतकरी कार्यकत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी सभापती संदिप मांडवे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुधे, ऍड. प्रमोद देवकर, गोपूजचे माजी सरपंच दत्तूकाका घार्गे, सुखदेव पवार, नितीन घार्गे, संजय जाधव, शशिकांत जाधव, किरण जाधव, महेश वाघ, बाबासाहेब फडतरे, युवराज घार्गे-देशमुख यांची उपस्थिती होती.
राजू शेट्टी म्हणाले, सत्ता असो अथवा नसो, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपण कायम संघर्षच केला आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळेच ऊस उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत. लोकसभा निवडणूकीपूर्वी विशिष्ट वातावरण निर्मिती झाली त्यामुळे आपणास पराभव सहन करावा लागला. सत्तेत असताना आपण कधीही व्यक्तीगत स्वार्थाची भूमिका घेतली नाही. त्यामुळे खासदारकीची सत्ता गेली तरी काही फरक पडत नाही. युती शासनाची भूमिका शेतकरी विरोधी असल्याचे जाणवल्याने आपण आघाडीला समर्थन देण्याचा निर्णय घेतला. परंतू आता त्यांच्याकडूनही फारसे समाधान होत नाही. मात्र दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने सद्या संघटना कार्यरत आहेत.
शेतकर्यांची थकीत ऊस बिले व इतर प्रश्नासंदर्भात आपण आक्रमक भूमिका घेणार आहे. मात्र शेतकर्यांनीही संघटना वाढीसाठी योगदान देणे काळाची गरज आहे. आपल्या विचाराचे पाच ते दहा आमदार आले तरी आपण चुकीच्या पध्दतीने वागणार्या साखर सम्राटांना तुरुंगात डांबू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी रायगांव येथील केन ऍग्रो साखर कारखान्याच्या थकीत बिलासंदर्भात जोरदार उहापोह झाला. जरंडेश्वर कारखान्याची मालकी सभासदांना पुन्हा मिळविण्यासाठी संस्थापिका डॉ. शालिनीताई पाटील यांना पहिल्यापासूनच आपले सहकार्य असल्याचे यावेळी शेट्टी यांनी नमूद केले. यावेळी नानासाहेब फडतरे, कानिफ फडतरे, संतोष फडतरे, भरत राऊत, दिलीप जगदाळे आदी उपस्थित होते.