पुलाची शिरोली/ वार्ताहर
प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीचे सरकार न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द आहे. पण यासाठी थोडावेळ दिला पाहिजे असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. पुलाची शिरोलीत सास्का नागरी सहकारी पतसंस्था नूतन इमारत व ग्रामपंचायत नूतन वाढीव इमारत उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धैर्यशील माने होते. यावेळी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, शिरोली गावासाठी येत्या कांही महिन्यात सांडपाणी प्रक्रिया व कचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड कडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. पुरामुळे नुकसान झालेला एकही माणूस शासकीय मदतीतून वंचित राहणार नाही. यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सोमवारी आदेश दिला जाणार आहे असे सांगितले.
राजाराम साखर कारखाना सभासद अपात्रेबाबत बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रामाणिक सभासद जो आहे तो राहिला पाहिजे. पण जे बाहेर गावचे आहेत ते अपात्र झाले पाहिजेत. यासाठी आपला न्यायालयीन लढा उभारला आहे असे सांगितले. गोकुळ दूध संघात वारेमाप खर्च होतो. तो बंद झाल्यास दूध उत्पादकांना दोन रुपये जादा दर मिळू शकेल. यासाठी माझा लढा सुरू आहे. यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावे असे आवाहन केले.
खासदार धैर्यशील माने यांनी, राजकारणात कोणी परत परत येत नाही, पण आलेल्या काळात विकासाची गंगा आणण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित व प्रामाणिक काम करत आहोत. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून भरीव निधी आणला जाईल. यासाठी पालकमंत्री म्हणून सतेज पाटील यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तसेच शिरोली ग्रामपंचायतीला पंधरा लाख रुपये निधी खासदार माने यांनी जाहीर केला.
आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, हातकणंगले मतदार संघातील जनतेने मला निवडणूक देवून मला संधी दिली आहे. याची परतफेड मी भरघोस निधी देवून करणार आहे. हे महाविकास आघाडीचे सरकार शेतकरी व अन्य घटकांना न्याय देण्याचे काम करील. तसेच शिरोलीला नगरपालिका मंजूर होण्यासाठी मी पुढाकार घेत असल्याचे आश्वासन आवळे यांनी दिले.
माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले, सास्का पतसंस्थेने गावात पारदर्शक काम करुन सहकारात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच सरपंच शशिकांत खवरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने गावात विविध विकास कामे करून गावाचा कायापालट केला आहे. सरपंच शशिकांत खवरे यांनी प्राधिकरण रद्द करावे तसेच शिरोली गावासाठी नगरपालिका मंजूर करावी अशी मागणी केली. सास्का पतसंस्थेचे चेअरमन प्रल्हाद खवरे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत बाजीराव सातपुते, सुत्रसंचालन महेश चव्हाण, आभार उत्तम पाटील यांनी मानले.
या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, सास्का पतसंस्थेचे चेअरमन प्रल्हाद खवरे, माजी सरपंच पंडीत खवरे, सर्जेराव खवरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाटील, लक्ष्मण कदम, राजेश यादव, शिवाजी पोवार, राहूल खवरे, ग्रामविकास अधिकारी ए.एस.कठारे, रुपाली खवरेवर, अलका पोर्लेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.