पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांचा अधिकाऱयांना इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱयांकडून जर नुकसान भरपाईमधील रक्कम कोणत्याही अधिकाऱयाने कमिशन म्हणून घेतली असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याला घरचा रस्ता दाखविला जाईल. मात्र, त्यासाठी शेतकऱयांनी पुराव्यासह माहिती द्यावी, असे आवाहन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले आहे.
सरकारी विश्रामधाम येथे अर्थसंकल्पाबाबत माहिती देताना पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी भ्रष्ट अधिकाऱयांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. हलगा-मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात काही शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. 77 लाख नुकसानभरपाई देण्यासाठी एका अधिकाऱयाने 11 लाख कमिशन मागितल्याचे पत्रकारांनी सांगितले. यावर पालकमंत्री रमेश जारकीहोळी चांगलेच संतापले. शेतकऱयांकडून जर अशा प्रकारे कोणत्याही अधिकाऱयाने रक्कम घेतली तर त्याला घरचा रस्ता दाखविला जाईल, असे त्यांनी सांगितले.
उत्तर कर्नाटकाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष निधी दिला आहे. याचबरोबर राज्य सरकारनेही विशेष निधीची तरतूद केली आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. उत्तर कर्नाटकाचा अधिक विकास करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करणार असून कोणतीही कामे प्रलंबित ठेवली जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
विशेषकरून शुद्ध पाणीपुरवठा करण्यावर अधिक भर दिला जाईल. याचबरोबर रस्ते तसेच इतर प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे, असेही पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती म्हणाले, स्थानिक शेतकऱयांकडूनच भात, जोंधळा, तुरडाळ, हरभरा खरेदी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न राहतील. स्थानिक शेतकऱयांकडून खरेदी करण्यात आलेले हेच अन्नधान्य रेशनकार्डवरून वितरित केले जाईल, असे सांगितले.
शेतकऱयांना विशेष कर्जपुरवठा करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहराला लागून रिंगरोड करण्यात येणार आहे, तो रिंगरोड करण्यासाठीदेखील पाठपुरावा करण्यात आला आहे. याचबरोबर इतर विकासासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने बेळगाव जिह्यासाठी विशेष निधीची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेवेळी आमदार अनिल बेनके, आमदार महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.