26 नोव्हेंबरपूर्वी मागण्या मान्य करण्याची राकेश टिकैत यांची मागणी- …अन्यथा दिल्लीला चहुबाजूंनी घेराव घालणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नोव्हेंबर 2020 पासून सुरू झालेल्या आंदोलनाला येत्या 26 नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता आंदोलक शेतकऱयांनी सरकारला पुन्हा एकदा कडक शब्दात इशारा दिला आहे. येत्या 26 दिवसात आपल्या मागण्यांची दखल न घेतल्यास पुन्हा एकदा ट्रक्टर मोर्चा काढून दिल्लीला चहुबाजूंनी घेरण्यात येईल, अशी ताकीद संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी दिली आहे.
शेतकरी आंदोलनाला वर्ष पूर्ण होत असताना ते अधिक तीव्र करण्याचा इरादा आता स्पष्ट झाला आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास यावेळी शेतकरी चारही बाजूंनी ट्रक्टर घेऊन दिल्लीला घेराव घालतील, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारकडे 26 नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबरपासून शेतकरी खेडय़ापाडय़ातून दिल्लीच्या आसपासच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होऊ लागतील. यावेळी भक्कम तटबंदी करण्यात येणार असून आंदोलनाच्या ठिकाणी तंबू उभारण्यात येणार आहेत, असे राकेश टिकैत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या 3 नवीन कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर 2020 पासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. दिल्ली सीमेला लागून असलेल्या हरियाणाच्या सिंघू आणि टिकरी सीमेवर पंजाब आणि हरियाणाचे हजारो शेतकरी धरणे आंदोलन करत आहेत. शेतकऱयांना दिल्लीत घुसू नये म्हणून दिल्ली पोलिसांनी 11 महिन्यांपूर्वी त्यांना सीमेवर रोखले होते. तेव्हापासून शेतकरी येथे तळ ठोकून आहेत. सुरुवातीला दोन्ही सीमेवर फक्त बॅरिकेड्स लावण्यात आले होते. 26 जानेवारी 2021 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर, टिकरी आणि सिंघू सीमेवर मोठय़ा प्रमाणात काँक्रीट ब्लॉक टाकण्यात आले होते.
पादचारी, दुचाकींसाठी रस्ता खुला
गेल्या आठवडय़ात सरकार आणि शेतकरी यांच्यात तीन दिवस चर्चा झाली. यानंतर रस्त्यावरील बॅरिकेडिंग हटवून 5 फूट रुंद रस्ता देण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी अडीच फूट लांबीच्या दोन लाईन उघडण्यात आल्या आहेत. त्यातून केवळ पादचारी आणि दुचाकीस्वारांनाच बाहेर पडता येईल. यासोबतच शेतकऱयांनी रुग्णवाहिका रिकामी करण्याचेही मान्य केले आहे. सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत या मार्गावरून ये-जा केली जात आहे.