राकेश टिकैत यांचे ट्विट : आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करण्यासाठी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार असल्याची घोषणा टिकैत यांनी केली आहे. त्यानुसार येत्या 26 जून रोजी ‘लोकशाही वाचवा, शेतकरी वाचवा’ दिवस साजरा केला जाणार आहे. 26 जून रोजी शेतकरी देशभरातील सर्व राजभवनांना घेराव घालतील, असे टिकैत यांनी जाहीर केले आहे. जल, जंगल आणि जमीन वाचवायची असेल, तर चोरांविरोधात लढाई, संघर्ष करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गतवषीच्या 26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिन्याच्या 26 तारखेला विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात शेतकऱयांचे गेल्या सहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारशी चर्चेच्या फेऱया झाल्यानंतरही यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. कोरोना संकटामुळे शेतकरी आंदोलनावर परिणाम झालेला पाहायला मिळाला. शेतकरी आंदोलनाला आता सात महिने होतील. यामुळे राष्ट्रपतींनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची गरज आहे, असे टिकैत म्हणाले. कोरोनाच्या नियमांमुळे आंदोलनस्थळी गर्दी कमी आहे. मात्र, आगामी काळात शेतकरी मोठय़ा प्रमाणावर आंदोलनस्थळी जमतील, असे टिकैत यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी ठोस निर्णय, तोडगा निघत नाही, तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.