नवव्या दिवशीही निदर्शने सुरूच : आज पुन्हा चर्चेची फेरी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱयांनी दिल्लीच्या सीमांवर सुरू असणारे आपले आंदोलन नवव्या दिवशी सुरूच ठेवले. हे कायदे रद्द करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार आंदोलकांनी केला आहे. तसेच मंगळवार, 8 डिसेंबर रोजी ‘देशव्यापी बंद’ची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे. नव्या केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठीच हा एकदिवसीय बंद पुकारण्यात आल्याची स्पष्टोक्ती शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी दिली आहे.
कृषी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱया पार पडल्या आहेत. मात्र, यामध्ये अंतिम तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळेच शेतकरी संघटनांनी सरकारवर दबाव टाकण्यासाठी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शनिवारीही शेतकरी संघटनांची सरकारसोबत बोलणी सुरू राहणार आहेत. आतापर्यंत बाजार समित्या आणि खासगी बाजारपेठेसंदर्भातील शेतकऱयांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार करण्याचे संकेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले. बाजार समित्यांचे संरक्षण करण्यास सरकार कटिबद्ध आहे. बाजारपेठमुक्त वातावरण, व्यापाऱयांची नोंदणी यामुळे बाजार समितीत आणि बाहेरही समान परिस्थिती राहील, असे ते म्हणाले.
शेतकऱयांच्या नेत्यांनी या चर्चेतून किंचितशी प्रगती झाली असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांच्यात बैठकीची पुढची फेरी शनिवारी होणार आहे. विज्ञान भवनमध्ये गुरुवारी झालेल्या चर्चेतून कोंडी फुटली नाही. शेतकऱयांची निदर्शने कडाक्याच्या थंडीतही नवव्या दिवशी सुरूच राहिली.
शेतकऱयांनी दिल्लीच्या सीमांवर केवळ ठिय्या दिला आहे, असे नव्हे तर दिल्ली-गाझियाबाद रस्त्यावर आपल्या जनावरांसहीत शेतकऱयांनी निदर्शने सुरू केली आहेत. उत्तर प्रदेशात जाणारा राष्ट्रीय महामार्ग नऊ शेतकऱयांनी रोखला आहे. सिंघू, टिकरी, चिल्ला आणि गाझियापूर सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुडगाव आणि झज्जर-बहादूरगढ या मार्गावरील वाहतूकही पोलिसांनी रोखून धरली आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यामुळे सिंघू आणि टिकरीसह शहरातील पाचही प्रवेशाचे प्रमुख मार्ग निदर्शनांमुळे बंद आहेत.