संतिबस्तवाड-किणये परिसरातील शेतकऱयांची जीवनदायिनी : दोन्ही काठांवर झाडेझुडुपे-अतिक्रमण : नदीच्या अस्तित्वासाठी धोरणात्मक नियोजनाची नितांत गरज
आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी
संतिबस्तवाड-किणये परिसरातील मुंगेत्री नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदीत केरकचरा मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येत आहे. तसेच झाडेझुडुपे व अतिक्रमणाच्या विळख्यात नदी सापडली आहे. नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रशासनामार्फत धोरणात्मक नियोजनाची गरज आहे.
किणये-संतिबस्तवाड या भागातील मुंगेत्री ही एकमेव नदी आहे. परिसरातील शेतकऱयांची ही नदी जीवनदायिनी आहे. मात्र, नदीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्यामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ आदींसह विविध योजनांसाठी लाखो रुपयांचा निधी प्रशासनाकडून खर्च करण्यात येतो. बहुतांश ठिकाणी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही योजना केवळ कागदोपत्रीच असते. प्रत्यक्षात मात्र पाणी अडवलेलेच नसते. मात्र तरीही योजना राबविण्यात आली असे दाखवून निधी लाटण्याचे प्रकार अधिक घडतात, असे पश्चिम भागातील शेतकऱयांचे म्हणणे आहे.
मुंगेत्री नदीत केरकचरा टाकण्यात येत आहे. बहुतांशी भागात नदीमध्ये व नदीच्या काठांवर झाडेझुडुपे वाढलेली आहेत. अतिक्रमणही झाले असल्याने नदीला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले असून याकडे असेच दुर्लक्ष होत राहिल्यास नदीचे अस्तित्व पूर्णपणे धोक्यात येणार आहे.
मुंगेत्री नदीचा उगम किणये भागातील डोंगरातून झालेला आहे. किणये, बहाद्दरवाडी, शिवनगर, रणकुंडये, वाघवडे, संतिबस्तवाड आदी भागातील शेतकऱयांसाठी ही नदी वरदान ठरणारी आहे.
गेल्या दहा-बारा वर्षांपूर्वी या नदीच्या पाण्यावरच नदीच्या काठावर शेती असणारे शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला घेत होते. अलीकडे मात्र नदी केरकचरा, झाडेझुडुपे व अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे.
घरांमध्ये धार्मिक पूजाविधी केल्यानंतर नागरिक निर्माल्य नदीत आणून टाकत आहेत. घरांमध्ये पूजाविधी होतो. त्यानंतर निर्माल्य नदीत टाकण्याची प्रथा आहे. नागरिकांनी आता ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. निर्माल्य जमिनीत खड्डा काढून त्या ठिकाणी टाकण्याची गरज आहे.
जोडव्यवसाय म्हणून परिसरातील शेतकरी दूध व्यवसाय करतात. बहुतांश शेतकऱयांची दोन-चार जनावरे आहेतच. रोज दूध विक्री करून ते आपल्या संसाराचा गाडा चालवितात. शेतकरी या दुभत्या जनावरांना दिवसभर चरण्यासाठी सोडतात. सायंकाळी त्यांना पाण्याची गरज असते. नदीत पाणी असते तेव्हा जनावरांना त्याचा उपयोग होतो. मात्र उन्हाळय़ात नदी कोरडी पडली की जनावरांचे हाल होतात. नदीत पाणीसाठा टिकून राहण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी शेतकऱयांची मागणी
आहे. संतिबस्तवाड गावाजवळील नदीवरील जुन्या पुलावर दरवर्षी पावसाळय़ात पाणी येते व हा जुना पूल पाण्याखाली जातो. त्याच्या बाजुलाच नवीन पूल बांधण्यात आला आहे. मात्र, या पुलाचे कामकाजही अर्धवट स्थितीत असल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेली दोन वर्षे अधिक पाऊस झाला. यावेळी या नवीन पुलावरही पाणी आले होते. त्यामुळे या पुलाची उंची वाढविणे गरजेचे होते, असे संतिबस्तवाड गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.
दुर्लक्षाचा शेतकऱयांना फटका
मुंगेत्री नदीवर काही ठिकाणी छोटे-छोटे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. पाणी अडविण्यासाठी हे बंधारे उपयुक्त ठरू शकतात. मात्र, नदीतील पाण्याचे प्रमाण कमी होत असताना या बंधाऱयांना फळय़ा घालणे गरजेचे आहे. यासाठी ग्रा. पं. सदस्य व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
लघु पाटबंधारे खात्याने लक्ष देणे आवश्यक
या भागातील शेतकऱयांसाठी ही नदी महत्त्वाची आहे. योग्य नियोजन केल्यास नदीमध्ये बऱयापैकी पाणी साठले जाईल. त्याचा फायदा शेतकऱयांना भाजीपाला व जनावरांसाठी होऊ शकतो. नदीकडे लघु पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयांनी लक्ष देण्याची गरज आहे. किणये व संतिबस्तवाड या दोन्ही ग्रा. पं. मार्फतही यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
– रामदास बस्तवाडकर, संतिबस्तवाड
सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे
किणये डोंगरपायथ्याशी अलीकडेच धरण झाले आहे. या धरणामुळे मुंगेत्री नदीला कायमस्वरुपी पाणी राहू शकते. पण मुंगेत्री नदीतील झाडेझुडुपे आणि केरकचऱयाची तातडीने साफसफाई करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत या नदीत केरकचरा टाकू नये. अतिक्रमण टाळून नदीत केरकचरा टाकणाऱयांवर कारवाई करण्याची गरज आहे. – कल्लाप्पा पाटील, वाघवडे