प्रतिनिधी/ सांगली
ज्यांनी शेतकऱयांची बिले बुडविली. सहकारी साखर कारखाना प्रायव्हेट केला अशी मंडळी आता पदवीधरच्या निवडणुकीत उतरून जनतेला उपदेशाचे डोस पाजत आहेत. ही मंडळी पदवीधरांचे काय प्रश्न सोडवणार? असा सवाल पालकमंत्री जयंत पाटील यांनी केला.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार अरूणआण्णा लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ सांगलीत डेक्कन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहनशेठ कदम, अनिल बाबर, विक्रम सावंत, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, विशाल पाटील, जयश्री पाटील, यांच्यासह जिल्हय़ातील काँग्रेस, राष्टवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, भाजपाचे नेते अफवा पसरवण्यात आघाडीवर आहेत. तो त्यांचा आवडीचा छंद आहे. या मतदारसंघाचे पूर्वीचे आमदार असणाऱया चंद्रकांतदादा पाटील यांनी सहा वर्षात पदवीधरांचे किती प्रश्न सोडविले ते सांगावे तसेच केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षात बेरोजगारीचा प्रश्न कितपत सोडविला ते ही जाहिरपणे सांगावे असे आवाहन त्यांनी केले. विरोधकांच्याकडे सध्याच्या परिस्थितीत कोणताही मुद्दा नसल्याने ते जनतेचा बुद्धिभेद करत आहेत. तसेच काहीतरी वावडय़ा उठवत आहेत. पण तसे काहीही नाही. पुणे मतदारसंघातील सर्व जिल्हय़ात महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱयांनी एकत्रित येऊन या निवडणूकीचा प्रचार वेगाने सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. कोणीही या निवडणुकीत गाफिल न राहता त्यांनी या निवडणुकीत लाड आणि आसगावकर यांना विक्रमी मताधिक्यांनी निवडून आणावे असे आवाहन केले.
उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यात ज्या पाच विभागाच्या निवडणुका सुरू आहेत. त्य़ा पाचही विभागात महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून आले पाहिजेत असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार शिवसेनेने राज्यातील या सर्व विभागातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकत लावली आहे. भाजपाने गेल्या पाच वर्षात शिक्षक आणि प्राध्यपकांचे एकही प्रश्न सोडविला नाही. उलट महाविकासआघाडी सत्तेवर आल्यावर त्यांनी या प्रश्नांना हात घातला आहे. प्राध्यपकांची भरती कोरोनाच्या काळात रोखण्यात आली होती. आता तीही लवकरच उठविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यपक यांच्या हिताचे रक्षण करणारेच निर्णय आम्ही घेतले आहेत. त्यामुळे आमच्याविरोधात त्यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. इंजिनिअरिंगच्या प्रवेशाचा भाजपाने एक जीआर काढला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना राज्य सोडून इतर राज्यात प्रवेश घेणे भाग पडले असते पण हा जीआर आपण रद्द केल्याने राज्यातील एक लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, अरूणअण्णा लाड यांच्याकडे स्वातंत्र्यसैनिक जी.डी.बापू लाड यांचा वारसा आहे. या देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत जी.डी.बापूंनी काम करून या देशाला स्वतंत्र केले आहे. त्यांच्याच विचाराची प्रेरणा घेवून अरूणआण्णा लाड कार्यरत आहेत. त्यांनी कुंडल परिसरात क्रांती उद्योगसमूह निर्माण करून हजारो लोकांना काम दिले आहे. पदवीधरांच्या हितासाठी ते निश्चितच काम करणार आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पदवीधरचे उमेदवार अरूणअण्णा लाड, शिक्षक उमेदवार प्रा. जयंत आसगावकर, आमदार अनिल बाबर, युवा नेते विशाल पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते, राष्ट्रवादीचे जिल्हय़ाध्यक्ष अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. स्वागत पृथ्वीराज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संदीप तांबवेकर यांनी केले. तर आभार संजय बजाज यांनी मानले.
स्वातंत्र्यलढय़ाचा वारसा
अरूणअण्णा लाड यांच्याकडे स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्ताचा आणि विचाराचा वारसा आहे. बापू यांच्या वारसानेच ते कार्यरत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचा काही मतांनी पराभव झाला होता. पण, या निवडणुकीत ते पहिल्याच फेरीत विजयी होतील असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
शिवसेनेची मते वाढली
गेल्या निवडणुकीत शिवसेनेची मते ही भाजपाच्या बाजूने होती. पण या निवडणुकीत ही संपूर्ण मते महाविकासआघाडीच्या बाजूने वळलली आहेत त्यामुळे हे अरूणआण्णा लाड आणि जयंत आसगावकर हे निश्चितच चांगल्या मतांनी विजय होतील यात कोणतीच शंका नाही, असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
शिवसेनेने बिभिषण बनावे
राम आणि रावणांच्या युध्दात रावणांच्या चुकीच्या गोष्टीना विरोध म्हणून रावणांचा भाऊ बिभिषण हा रामाच्या बाजूने लढाईत उतरला होता. त्यामुळे रामाचा विजय झाला होता आता शिवसेनेने या निवडणुकीत बिभिषण बनून भाजपाचा पराभव करावा असा आवाहन राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.