प्रतिनिधी / बेळगाव
हलगा-मच्छे बायपाससंदर्भात शेतकऱयांनी प्रादेशिक आयुक्त बिश्वास यांची भेट घेऊन जिल्हा शासनाकडून होत असलेल्या दडपशाहीची माहिती दिली. यावेळी आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असे शेतकऱयांनी प्रादेशिक आयुक्तांना सांगितले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रस्त्याची व परिसराची पाहणी केली आहे. यापूर्वी बैठक घेऊन त्यांनी शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घेतले होते. मात्र पुन्हा जमीन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तातडीने याबाबत सूचना करून या रस्त्याचा आग्रह सोडण्यास भाग पाडा, अशी विनंती करण्यात आली. यावेळी प्रकाश नाईक, विलास घाडी, राजू मरवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱयांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये! प्रांताधिकारी कार्यालयाकडे न जाण्याचे शेतकऱयांना आवाहन
हलगा-मच्छे बायपास रस्त्याची पाहणी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे. त्यावेळी त्यांनी शेतकऱयांची बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, हलगा व मच्छे परिसरातील शेतकऱयांना बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाकडे बोलाविले आहे. अचानकपणे शेतकऱयांना बोलाविण्यात आले असून शेतकऱयांनी कोणत्याही परिस्थितीत प्रांताधिकारी कार्यालयाकडे जावू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्यामध्ये शेतकऱयांची सुपीक जमीन गेली आहे. बहुसंख्य शेतकऱयांनी त्याला विरोध केला आहे. रक्कम घेण्यासही नकार दिला आहे. असे असताना काही एजंट हा कारभार करत आहेत. तेव्हा कोणीही त्यांच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच प्रांताधिकारी कार्यालयाकडे जावू नये. जिल्हाधिकारी बैठक घेऊन आपला निर्णय देत नाहीत, तोपर्यंत इतर कार्यालयाकडे किंवा एजंटांकडे जावू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेचे राजू मरवे यांनी केले आहे.