वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
देशातील शेतकरी बांधवांच्या आंदोलनाचा परिणाम बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारावर दिसून येत आहे. मंगळवारी भारत बंदमुळे बाजार अजून सावरलेला नाही. बुधवारी पण कांदा आवक तेवढीच होती. याचा परिणाम आवक जरी स्थिर असली तरी कांदा दरात 500 ते 700 रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी विकी (महेश) सचदेव यांनी दिली.
शनिवारी बाजारातील 35 ट्रक कांदा आवकेपेक्षा कर्नाटकातील तीन ट्रक कांदा तर उर्वरित सर्व कांदा महाराष्ट्रातील होता. यामध्ये व्यापारी वर्गाची मोठय़ा प्रमाणात तर शेतकरी बांधवांची तुरळक प्रमाणात आवक होती. जुना कांदा 500 रुपयांनी तर नवीन कांदा 700 रुपये वधारला.
नवीन 2000 ते 4200
जुना 2000 ते 4000
सफेद 5000 ते 6000
परराज्यातील कांद्याचे भावही 500 ते 1000 रु. वधारले. शनिवारच्या बाजारात इराणचा कांदा 3 ट्रक इतका होता. त्याचा भाव 1000 ते 3200 रु. झाला.
बेळगाव बाजारातील जवारी बटाटा आवक अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर अखेरपर्यंत बटाटा आवक संपुष्टात येण्याची शक्यता आहे. बाजारात 400 पिशव्या इतकी स्थानिक जवारी बटाटा आवक होती. आजच्या बाजारीही बियाणांचे बटाटे तेजीत जात आहे. तर गोळा बटाटय़ाला मागणी कमी असल्याने त्याचे भाव कमी होत असल्याची माहिती व्यापारी वाय. बी. चव्हाण यांनी दिली.
जवारी बटाटय़ाचे भाव
गोळी 1500 ते 2000
मध्यम 2500 ते 4050
गोळी 2500 ते 3000
भाजी आवकेत वाढ
बेळगावसह इतर बाजारपेठेमध्ये मोठय़ा प्रमाणात भाजीची आवक होत आहे. त्यातच हॉटेल व्यवसाय मंदावला आहे. त्यामुळे परराज्यातील बटाटय़ाचे भाव सुद्धा 200 ते 500 रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारात इंदोर आणि कोलार बटाटय़ाचे भाव स्थिर आहेत. तर आग्रा 400 रु., गुजरातचा डिसा बटाटा 500 रु. कमी झाला असल्याची माहिती व्यापारी संजय पाटील यांनी दिली.
बटाटय़ाचे भाव
इंदोर 2800 ते 3400
आग्रा 2500 ते 2600
तळेगाव 2200 ते 2800
कोलार 3500 ते 4000
गुजरात 2000 ते 2500
बेळगाव एपीएमसीतून मोठय़ा प्रमाणात रताळी दिल्ली बाजारपेठेमध्ये जात असतात. थंडीच्या आणि सणासुदीच्या हंगामात रताण पिकाला मोठी मागणी असते. मात्र शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका रताळी पिकाला बसला आहे. रताळी पिकाचे भाव 50 रुपयांनी कमी झाले असल्याची माहिती व्यापारी अशोक कुट्रे यांनी दिली.
चांगल्या प्रतीच्या रताळय़ाचा भाव 750 ते 850
सर्वसाधारण रताळी 500 ते 700 रुपयामध्ये विक्री झाली.