समाजसेवक अमित पाटकर यांची टीका, सोनफातोर – तिळामळ येथील शेतकऱयांना कापणीसाठी यंत्राची व्यवस्था
प्रतिनिधी /कुडचडे
सर्वांना माहीत आहे की, शेती हा आपल्या देशाचा कणा आहे पण सध्या संपूर्ण देशात शेतकरी त्रासात पडलेले आहेत, हे विविध माध्यमांतून दिसून येत आहे. तरीही त्यात सरकारकडून लक्ष घातले जात नाही, ही दुःखाची गोष्ट आहे. देशातील भाजप सरकार हे शेतकऱयांचे अस्तित्व संपविण्याच्या विचारात असल्याचे लोकांना मानणे भाग पडत आहे, अशी टीका समाजसेवक अमित पाटकर यांनी केली आहे.
शेतकऱयांची स्थिती बिकट झाल्याचे दिसत असून सुद्धा खोटी आश्वासने देऊन सरकार शेतकऱयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. याचेच एक उदाहरण सोनफातोर, तिळामळ या परिसरातील शेतकऱयांचे आहे. या गावात कितीतरी शेतकरी आहेत, पण आजपर्यंत राज्य सरकारकडून त्यांना कोणतीच सुविधा प्राप्त न झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कारणास्तव आपण याअगोदर त्यांना मदत म्हणून शेतीसाठी लागणारे खत व इतर सामुग्री दिली होती. आता कापणीची वेळ झाली तरी सरकारकडून कोणतीच साधने उपलब्ध होत नसल्याची माहिती या शेतकऱयांनी दिल्याने आपण त्यांच्यासाठी कापणी यंत्राची व्यवस्था करून दिली असल्याचे पाटकर यांनी सांगितले.
सोनफातोर, तिळामळ येथील शेतकऱयांनी कापणी यंत्राची व्यवस्था करून दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी व कामाची सुरुवात करण्यासाठी पाटकर यांना बोलाविण्यात आले होते. यावेळी कुडचडे काँग्रेस गटाध्यक्ष पुष्कल सावंत, मनोहर नाईक, उपाध्यक्ष एल्टन फर्नांडिस, मानुएल फर्नांडिस, आशा पिंटा व इतर मान्यवर उपस्थित होते. शेतकऱयांचे मुद्दे न घेता सेलिब्रिटींचे मुद्दे घेऊन देशात धुमाकूळ माजवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत आहे. अशी स्थिती काँग्रेसचे सरकार असताना कधीच निर्माण झाली नव्हती व यापुढे काँग्रेसचे सरकार येणार तेव्हाही कधीच निर्माण होणार नाही. यावर जनतेने व खास करून शेतकऱयांनी लक्ष केंद्रित केले व वस्तुस्थिती जाणून घेतली तरच पुढे चांगले दिवस बघायला मिळतील, असे पाटकर म्हणाले.
भाजप सरकार सुविधा जाहीर करते व त्या शंभर टक्के जनतेने घेतल्याचे जाहीर करते. पण प्रत्यक्षात सदर सुविधा कोणी घेतल्या आहेत, त्याची कोणतीच सूची त्यांच्याजवळ नसते. हे याअगोदरही दिसून आलेले आहे. त्यामुळे लोकांनी सावध व्हायला हवे व कोणत्याच आमिषाला बळी न पडता ताठ उभे राहून स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला हवा, असे पुष्कल सावंत म्हणाले. मनोहर नाईक यांनीही सर्वांना काँग्रेस पक्षाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.