काँग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड, कम्युनिस्ट, आप, शिवसेना सहभागी होणार
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील काँग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड या प्रमुख विरोधी पक्षांनी शेतकऱयांच्या ‘भारत बंद’ आंदोलनास पाठिंबा दर्शविला असून त्यांच्यासाठी आणलेले तीन नवीन कायदे रद्द करावेत, अशी मागणी या विरोधी पक्षांनी केली आहे. ते कायदे गोव्यासह देशातील शेतकऱयांच्या हिताचे नाहीत तर त्यांच्यावर अन्यायकारक असल्याने ते मागे घेण्यात यावेत, असे विरोधी पक्षांनी सूचवले आहे.
शेतकरी देशातील जनतेसाठी धान्य पिकवत असून त्याला देशोधडीला लावणारे कायदे सरकारने करू नयेत. केलेले तीनही कायदे मागे घ्यावेत म्हणून गेले अनेक दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्या मोदी सरकारने मान्य कराव्यात, असे राज्यातील विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे आज धरणे आंदोलन
गोवा प्रदेश काँग्रेसतर्फे पणजीतील आझाद मैदानावर मंगळवारी सकाळी 10.30 वा. धरणे आंदोलन करण्यात येणार असून शेतकऱयांच्या भारत बंदला समर्थन दिले असल्याची माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली आहे. कृषी क्षेत्र भांडवलदारांच्या हातात सोपवण्याचा सरकारचा डाव असून त्यासाठीच शेतकऱयांना चिरडून टाकणारे कायदे आणले असल्याची टीका चोडणकर यांनी केली आहे.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनीही शेतकऱयांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.
आंदोलनास पाठिंबा, मात्र खासगी बसेस बंद नाही
गोव्यातील खासगी प्रवासी वाहतूक सेवा बहुतांशी गेल्या अनेक महिन्यांपासून बंदच आहे. केवळ 25 ते 30 खासगी प्रवासी बसगाडय़ा चालू आहेत. त्या बंद ठेवून त्यांना फारसे काही मिळणार नाही. म्हणून त्या बंद ठेवण्यासाठी दबाव असणार नाही तथापि शेतकरी आंदोलनास मात्र पाठिंबा आहे व आझाद मैदानावर धरणे निदर्शने करणार असे बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले.
कदंब बससेवा सुरुच राहणार
कदंब परिवहन महामंडळाची सेवा चालूच रहाणार असून त्यात कोणताही खंड पडणार नाही अशी माहिती महामंडळाच्या सुत्रानी दिली.
आयटक, कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा
आयटक कामगार संघटना आणि कम्युनिस्ट पार्टी गोवा शाखेने शेतकरीवर्गाने पुकारलेल्या दि. 8 रोजीच्या भारत बंदला समर्थन दिले असून आज सकाळी 10 वाजल्यापासून आझार मैदान पणजी येथे निदर्शने केली जाणार आहे. आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका आणि कम्युनिस्ट पक्षाचे सचिव राजू मंगेशकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. सरकारची कृषी विषयक धोरणे शेतकऱयांच्या विरोधात असून शेतकऱयांच्या हिताचा विचार न करता त्यांना मोदी सरकार नष्ट करू पाहत आहे, अशी टीका फोन्सेका व मंगेशकर यांनी केली. जनतेने या भारत बंद मध्ये सहभागी होऊन शेतकऱयांना पाठिंबा द्यावा. तसेच आंदोलन भाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आंदोलन शेतकऱयांचे नव्हे, दलालांचे!
आजच्या भारत बंदला गोवा सुरक्षा मंचचा विरोध असल्याची स्पष्ट भूमिका गोवा प्रदेशाध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी मांडली आहे. वास्तविक या आंदोलनात शेतकऱयाला शोधावे लागेल. कारण या देशभर सुरू असलेल्या आंदोलनात शेतकरी दिसतच नाही. हरियाणा – पंजाब येथील धनदांडग्या दलालांचे हे आंदोलन आहे. या आंदोलनाचा प्रत्यक्ष शेतकऱयांना काहीच लाभ नाही वा संबंधही नाही. हे आंदोलन फक्त आणि फक्त दलाली बंद होऊ नये, यासाठी आहे, म्हणूनच आमचा या आंदोलनाला विरोध आहे, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले. आमच्या देशातील शेतकऱयांचे जर हे आंदोलन असेल तर त्यात विदेशी मंडळींचा संबंध काय? दलाली बंद झालीच पाहिजे, कारण याच दलाली मुळेच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दलाली बंद झाल्याशिवाय बळीराजाची परिस्थिती बदलणार नाही, असेही नितीन फळदेसाई म्हणाले.
‘भारत बंद’चा गोव्यात परिणाम नाही
आज मंगळवार 8 डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांतर्फे पुकारण्यात आलेल्या देशव्यापी ‘भारत बंद’ चा गोवा राज्यावर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यातील सर्व सेवा जनजीवन नेहमीप्रमाणे चालू रहाणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. ‘भारत बंद’ ला गोव्यात प्रतिसाद मिळणार नाही, असे भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन शेतकरी कायद्याची माहिती गोव्यातील शेतकरी वर्गास देण्यात आली असून त्या कायद्याचा शेतकऱयांना लाभच होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गोव्यातील शेतकरी व लोक या भारत बंद ला पाठिंबा देणार नाहीत. शिवाय गोव्यातील जनजीवन, नित्य व्यवहार सुरळीत ठेवतील, असे त्यांनी नमूद केले.