माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
हडी, तोंडवळी, आचरा येथील केज फार्मिंगची पाहणी
वार्ताहर / मालवण:
सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत जिल्हय़ात कमी कालावधीत भरघोस उत्पन्न देणाऱया हळद लागवडीचा प्रयोग करण्यात आला आहे. जिल्हय़ात हळदीचा
ब्रँड तयार झाल्यास येथील शेतकऱयांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल. शेतकऱयांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रयत्न असतील, असे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी कांदळगाव येथे सांगितले.
मालवण दौऱयावर आलेल्या चव्हाण यांनी पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेला बळ देण्याच्या पार्श्वभूमीवर हडी, तोंडवळी, आचरा येथे बचतगट तसेच खासगी तत्त्वावर राबविलेल्या केज फार्मिंगची पाहणी केली. लॉकडाऊनच्या काळात या व्यावसायिकांना ज्या अडचणी आल्या, त्याची माहिती घेतली. त्यानंतर कांदळगाव येथील नीलक्रांती मल्टिपर्पज सेंटर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, विलास हडकर, डॉ. प्रसाद देवधर, डॉ. नितीन सावंत, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, दीपक पाटकर, रविकिरण तोरसकर, भाऊ सामंत, बाबा परब, गणेश कुशे, पूजा सरकारे, आप्पा लुडबे, अविनाश पराडकर आदी उपस्थित होते.
मत्स्य संपदा योजनेतून मत्स्य पालनाला प्रोत्साहन!
कोरोनाच्या संकट काळात कोकणातील चाकरमान्यांसाठी काही करता येईल का, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विविध योजना राबविण्यात येत आहेत. खाडी क्षेत्राबरोबरच ज्या ठिकाणी नैसर्गिक तळय़ा आहेत. अशा ठिकाणांचा शोध घेण्यात आला असून दहा ते पंधरा जागा जिल्हय़ात निश्चित करण्यात आल्या आहेत. याठिकाणी पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मत्स्यपालनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. मुंबईतून जे चाकरमानी येथे आले, त्यातील तरुण या व्यवसायात उतरावेत, यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रयत्न असतील. जेणेकरून तरुणांचे स्थलांतर थांबेल. जिल्हय़ातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने काम करत असून याचे यश येत्या तीन महिन्यात आपल्याला दिसून येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.