अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान : भातपीक जमीनदोस्त : बळीराजा हतबल : सुक्या चाऱयाचाही प्रश्न गंभीर
वार्ताहर /किणये
अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी अन्न पिकविणाऱया बळीराजाला नेहमीच अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी व अयोग्य हमीभाव या दृष्टचक्रात शेतकरी अडकलेला आहे. सध्या गेल्या आठ-दहा दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्षभर शिवारात राबून, मेहनत करून पिके घेण्यात आली आहेत. सुगी हंगामाची लगबग सुरू झाली आणि ऐन सुगी हंगामातच अवकाळी पावसाला प्रारंभ झाला.. अन् या पावसाने शेतकऱयांच्या शिवारात व डोळय़ातही पाणी आणले.
काही शेतकऱयांनी शेतात भात कापणी करून ठेवली होती. सतत पाऊस झाल्याने कापणी करून ठेवलेल्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. कापून ठेवलेल्या भाताला कोंब फुटल्याने संपूर्ण भात वाया गेल्यातच जमा आहे. यामुळे शेतकऱयांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. शिवारातच भाताची उगवण झाली असल्याने बळीराजाच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवारातील भात गंज्यांमध्येही पावसाचे पाणी
शिवारात ठेवण्यात आलेल्या भाताच्या गंज्यांमध्येही पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे गंजीतील भातही खराब झाले आहे. मळणी करण्याआधीच भाताचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे. सर्रास शेतांमधील भात पिके कापणीला आलेली आहेत. मात्र, पाऊस पडल्याने भात कापणीची उर्वरित कामे खोळंबली. कापणीचा हंगाम गेल्याने 50 टक्के भातही खराब झाले असून ते काळसर दिसून येत आहे. काही शिवारांमध्ये पावसामुळे पिके आडवी झाली आहेत. भाताची मळणी केल्यानंतर पिंजर साठवून ठेवण्यात येते. वर्षभर जनावरांसाठी सुका चारा म्हणून त्याचा वापर केला जातो. यंदा पिके भिजून खराब झाली असल्याने सुक्या चाऱयाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
रब्बी पेरणी लांबणीवर
पावसामुळे ऐन हंगामात शिवारांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे रब्बी हंगाम साधावा कसा? असा प्रश्नही शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे. कापणी केल्यानंतर बहुतांशी शेतकरी ज्वारी, वाटाणा, हरभरा, मसूर, मोहरी आदींची पेरणी करतात. रब्बीची पेरणीही लांबणीवर पडणार आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱयांना प्रशासनाकडून मदतीची गरज आहे. नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱयांनी आपल्या भागातील तलाठय़ांना भेटून लागणाऱया कागदपत्रांची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे.